ब्रिटिश प्रवाशांसाठी क्वारंटाईन सक्तीचे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटनमध्येच तयार झालेल्या आणि भारतमध्ये उत्पादित होत असलेल्या कोविशिल्ड लसीला ब्रिटनने मान्यता न दिल्याने भारतानेही ब्रिटनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतात येणाऱया ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध लादण्यात येत असून दहा दिवसांचे विलगीकरण (क्वारंटाईन) अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणी लागू करण्यात आली आहे.
कोणताही ब्रिटिश नागरिक भारतात आल्यास त्याला दहा दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. तसेच विलगीकरणाच्या आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागणार आहे. ब्रिटिश प्रवाशांना एक तर होम क्वारंटाईन किंवा डेस्टीनेशन क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.
या प्रवाशांनी कोणतीही लस घेतलेली असली व त्याचे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे असले तरीही त्यांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच भारतात येण्यापूर्वी तीन दिवस त्यांना आरटीपीसीआर चाचणीही करून त्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. ऑक्टोबर 4 पासून हे नवे निर्बंध लागू होत आहेत.
पुढील सहा ते आठ आठवडे महत्त्वाचे
भारतात कोरोनाचा दुसरा उद्रेक अद्यापही सुरूच आहे. रुग्णसंख्या कमी होत असली आणि बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरीही धोका टळलेला नाही. पुरेशी सावधगिरी आणि नियमांचे कठोर पालन न सांभाळल्यास तिसऱया लाटेला तोंड द्यावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला.
पुढील सहा ते आठ आठवडे अतिशय महत्त्वाचे आहेत. या कालावधीत कोरोना नियमांचे कसोशीने पालन सर्वांनाच करावे लागणार आहे. यात कोठेही ढिलाई दाखविता कामा नये. मास्कचा उपयोग आणि सामाजिक अंतराचा नियम अगत्याने पाळावयास हवा. कोरोना संपला अशी गैरसमजूत कोणीही करून घेऊ नये. सणाच्या काळात गर्दी टाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारात गर्दी केल्यास ते तिसऱया उद्रेकाला निमंत्रण ठरेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
26,727 नवे रुग्ण
गुरुवार संध्याकाळ ते शुक्रवार संध्याकाळ या 24 तासांमध्ये भारतात नवे 26,727 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीत 28,246 रुग्ण बरे झाले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी कमी होऊन ती 2,75,224 एवढी आहे. गेल्या 196 दिवसांमध्ये हा नीचांक आहे. 26,727 पैकी 15 हजारहून अधिक रुग्ण एकटय़ा केरळ राज्यात आढळून आले.
लसीकरण जोरात
गेल्या नऊ महिन्यांत भारतात एकंदर 89,02,08,007 (89 कोटीहून अधिक) लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यांना लसीची किमान एक मात्रा देण्यात आली आहे. वर्षअखेरपर्यंत 120 कोटी लोकांना लसीची किमान एक मात्रा देण्याची योजना भारत सरकारने आखली आहे. ती निर्धारित वेळेआधीच पूर्ण होऊ शकेल, अशी परिस्थिती असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.