बुमराह, शमीला मर्यादित षटकांच्या मालिकेत काही सामन्यांमधून विश्रांती देण्याचा प्रस्ताव विचाराधीन, टी-20 मधून विश्रांतीची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे आघाडीचे जलद गोलंदाज जसप्रित बुमराह व मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी क्रिकेट मालिकेत मर्यादित षटकांचे सर्व सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघव्यवस्थापनाने दि. 17 डिसेंबरपासून खेळवल्या जाणाऱया कसोटी मालिकेवर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याने बुमराह व शमी यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत कमी संधी दिली जाईल, असे संकेत आहेत.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर पोहोचला असून उभय संघात 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत सिडनी व कॅनबेरा येथे 3 वनडे व 3 टी-20 सामने होणार आहेत. त्यानंतर दोन्ही संघ 4 कसोटी सामन्यात आमनेसामने भिडतील.
बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासाठी इशांत शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही तर अशा परिस्थितीत बुमराह व शमीवरील भार महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्यक्ष कसोटी मालिकेपूर्वी दि. 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत ड्रमोन्य ओव्हल येथे लाल चेंडूवरील सराव सामना होत आहे. अर्थात, सराव सामना आणि भारताचा दुसरा व तिसरा टी-20 सामना यांच्या तारखांची सरमिसळ होत असल्याने भारताला कसोटी मालिकेच्या दृष्टीने स्वतंत्र विचार करावा लागणार आहे.
कसोटी मालिकेत भारताची मुख्य भिस्त बुमराह व शमी यांच्यावरच असणार आहे. त्यामुळे, कसोटी मालिकेला अवघ्या 12 दिवसांचा अवधी बाकी असताना भारतीय संघव्यवस्थापन (मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण) या उभयतांना मर्यादित षटकांच्या पूर्ण मालिकेत खेळवण्याचा अजिबात धोका स्वीकारणार नाही, असे सध्याचे संकेत आहेत. साहजिकच, शमी व बुमराह यांना रोटेट केले जाईल, असेही मानले जाते.
मोहम्मद शमीने सराव सत्रात फक्त गुलाबी व लाल चेंडूने सराव केला आहे. त्यामुळे, भारतीय संघाचे प्राधान्य कसोटी मालिकेला असेल, हेच यावरुन अधोरेखित होत आले आहे.
‘बुमराह व शमी या दोघांनाही टी-20 मालिकेतील 3 सामन्यात (4, 6 व 8 डिसेंबर) खेळवले तर दि. 6 ते 8 डिसेंबर या कालावधीतील तीन दिवसांच्या सराव सामन्यात ते अर्थातच सहभागी होऊ शकणार नाहीत आणि सराव सामन्याशिवाय, या अव्वल गोलंदाजांना कसोटी मालिकेत उतरवण्याचे अति साहस भारतीय संघव्यवस्थापन निश्चितच करणार नाही’, असे बीसीसीआयमधील सूत्राने नमूद केले. बुमराह व शमी यांना वनडे मालिकेत खेळवायचे व टी-20 मालिकेतून विश्रांती देत कसोटी मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे, हा एक पर्याय बीसीसीआयच्या विचाराधीन असणार आहे. वनडे मालिकेतून थेट सराव सामन्यात खेळले तर कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने त्यांची तयारी उत्तम होऊ शकते, असाही यामागे विचार आहे.
दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर, दि. 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत भारतीय संघ गुलाबी चेंडूने खेळण्याची रिहर्सल करेल. यानुसार, टी-20 संघात दीपक चहर, थंगसरु ‘यॉर्कर’ नटराजन, नवदीप सैनी हे जलद गोलंदाज तर यजुवेंद्र चहल, रविंद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर या फिरकी गोलंदाजांचा समावेश जवळपास निश्चित असू शकतो.
वृद्धिमान साहाचा कसून सराव पुनरागमनाचे संकेत
सिडनी : अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने बुधवारी कसून सरावाला सुरुवात केली. यामुळे, दि. 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत होणाऱया पहिल्या कसोटी सामन्यात त्याचा सहभाग निश्चित मानला जातो. साहा हा भारताच्या काही उत्तम यष्टीरक्षकांपैकी एक असून अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल मोसमात त्याने सनरायजर्स हैदराबादतर्फे उत्तम योगदान दिले होते. त्याने दोनवेळा सामना जिंकून देणाऱया दोन अर्धशतकी खेळी देखील साकारल्या. मात्र, याचवेळी धोंडशिरेची दुखापत देखील झाली आणि त्याला चार आठवडय़ांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.
36 वर्षीय साहाला आयपीएल स्पर्धेतील एलिमिनेटर व दुसऱया क्वॉलिफायर लढतीला मुकावे लागले. त्यानंतर बुधवारी मात्र तो पूर्ण क्षमतेने सराव करताना दिसून आला. लंकन डावखुरा स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्ने व भारतीय गोलंदाज दयानंद गरानी यांच्या थ्रो डाऊनवर त्याने सराव केला. साहाने यावेळी यष्टीमागे सराव केला नाही आणि बीसीसीआय मीडियाने अपलोड केलेल्या व्हीडिओत त्याच्या तंदुरुस्तीचा स्तर पूर्ण स्पष्ट होत नाही. अर्थात, याचवेळी सराव सत्रात साहा अवघडलेला देखील दिसून आला नाही. त्याच्या हालचाली नेहमीसारख्या चपळ राहिल्या.
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी अलीकडेच साहा पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्ण तंदुरुस्त असेल, असा विश्वास व्यक्त केला होता. नितीन पटेल व निक वेब त्याच्या तंदुरुस्तीसाठी अधिक प्रयत्नशील राहिले आहेत.
यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध मागील कसोटी मालिकेत साहाला वगळत ऋषभ पंतला त्याच्या सरस फलंदाजीसाठी प्राधान्य देण्यात आले. पण, यंदा आयपीएलमध्ये ऋषभ पंत सपशेल अपयशी ठरला. त्याची तंदुरुस्तीही पूर्वीसारखी राहिली नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे, भारतीय संघव्यवस्थापन त्याच्याबाबत अनुकूल राहण्याची शक्यता धुसर मानली जाते. साहा पूर्ण तंदुरुस्त होऊ शकला तर 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत तोच प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक असेल, असे सध्याचे संकेत आहेत.
शोएब अख्तरचा सवाल
रोहित उत्तम खेळला तर नेतृत्व विभागणीचा विचार कसा टाळणार?
नवी दिल्ली : रोहित शर्माने विराट कोहलीच्या गैरहजेरीत नेतृत्वगुणांची उत्तम चुणूक दाखवली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण असेल, असे प्रतिपादन पाकिस्तानचा माजी स्पीडस्टार शोएब अख्तरने केले आहे. रोहित शर्माने आयपीएल स्पर्धेत मुंबईला पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील नेतृत्वाची क्रिकेट प्रकारानिहाय विभागणी व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, शोएब अख्तर बोलत होता. रोहितने विराटच्या गैरहजेरीत भारताला आशिया चषकाचे जेतेपदही संपादन करुन दिले आहे.
सध्या अजिंक्य रहाणे उपकर्णधारपद भूषवत आहे. पण, तरीही शोएब अख्तरला रोहित कर्णधारपदासाठी अधिक योग्य भासतो. ऍडलेडमधील पहिली कसोटी झाल्यानंतर विराट मायदेशी परतेल आणि उर्वरित 3 कसोटी सामन्यात रोहित हाच कर्णधार असेल, यावर अख्तर ठाम आहे.
‘विराटवर किती भार आहे, याचा कुठे तरी विचार व्हायला हवा. विराट 2010 पासून सातत्याने खेळत आहे. यादरम्यान त्याने 70 शतके झळकावली आहेत. शिवाय, धावांचे डोंगर रचले आहेत. दुसरीकडे, रोहित आता नेतृत्वासाठी पूर्ण सज्ज आहे. रोहितकडे नेतृत्वाची धुरा सोपवून विराटला थोडी मोकळीक देणे रास्त ठरेल’, असे शोएब अख्तरला वाटते.
विदेशात सलामीवीर या नात्याने रोहितला प्रथमच स्वतःला आजमावण्याची संधी येथे मिळेल आणि पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क व जोश हॅझलवूड यांच्यासारख्या गोलंदाजांना सामोरे जाताना निश्चितच त्याचा कस लागू शकतो, असे प्रथमदर्शनी चित्र आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात पहिलीवहिली कसोटी मालिका जिंकली. पण, यंदा कोहली पहिल्या कसोटीनंतर उपलब्ध नसेल आणि वॉर्नर-स्मिथ यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आता अधिक मजबूत आहे, त्याचा फरक पडू शकतो. कोहलीच्या गैरहजेरीत केएल राहुल चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरु शकतो, अशी सूचनाही अख्तरने येथे केली आहे.