नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने अफगाणिस्तानची अवस्था लक्षात घेऊन त्या देशाला 50 हजार टन गहू मानवतेच्या भूमिकेतून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या गव्हाच्या ट्रक्स पाकिस्तानातून जाऊ देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. आता हा नकार मागे घेण्यात आला आहे, मात्र, पाकिस्तानातून मार्ग देण्यासाठी त्या देशाने अटी घालून अडवणूक सुरु केली असून भारताला अटींची यादीच पाठविली आहे. हा गहू पाकिस्तानच्या ट्रक्समधून पाठविला पाहिजे ही महत्वाची अट आहे. तथापि, भारताने ही अट मान्य करण्यास नकार दिला असून भारताच्या ट्रक्स नसतील तर अफगाणिस्तानच्या ट्रक्सना पाकने अनुमती द्यावी, असा आग्रह धरला आहे. तसेच पाकिस्तानने या ट्रक्सवर शिपमेंट चार्जही लागू केला आहे. तथापि हे साहाय भारत मानवतेच्या भूमिकेतून देत असल्याने त्यावर अतिरिक्त चार्ज लावला जाऊ नये अशी भारताची भूमिका आहे. परिणामी चर्चा अनिर्णित आहे.