वृत्तसंस्था/ मेलबर्न :
येत्या ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर येईल व उभय संघात पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण मालिका होईल, असे गुरुवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या घोषणेमुळे बऱयाच आठवडय़ांपासून चालत आलेली संभ्रमावस्था तूर्तास निकाली लागली आहे. उभय संघातील या मालिकेत 4 कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामने होणार आहेत.
कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे जागतिक स्तरावरील सर्व स्पर्धा-मालिका ठप्प झाल्या आहेत. ऑलिम्पिक-आयपीएल स्पर्धा लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत तर अनेक स्पर्धा रद्दही कराव्या लागल्या आहेत. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दलही विचारविनिमय सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होणार का, याबद्दल संभ्रमावस्था असणे साहजिक होते. तूर्तास, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या घोषणेमुळे या साऱया चर्चेला तात्पुरता पूर्णविराम मिळाला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढील 6 महिन्यांची रुपरेषा जाहीर केली असून त्यांच्या मायदेशातील हंगामाची सुरुवात झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेच्या माध्यमातून होईल. 3 सामन्यांची ही मालिका दि. 9 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
टी-20 लढतीने मालिकेला प्रारंभ
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेबसाईटवर प्रसारित केलेल्या रुपरेषेप्रमाणे भारताविरुद्धची मालिका टी-20 सामन्याच्या माध्यमातून सुरु होईल. उभय संघात दि. 11 ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेन येथे पहिली लढत होईल तर त्यानंतर दि. 14 ऑक्टोबर (कॅनबेरा), 17 ऑक्टोबर (ऍडलेड) रोजी उर्वरित दोन सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणे अपेक्षित आहे.
टी-20 नंतर विराट कोहलीचा संघ यजमान संघाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळेल
उभय संघात दि. 3 डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे पहिली कसोटी होईल व त्यानंतर ऍडलेडमध्ये 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत दिवस-रात्र कसोटी खेळवली जाणार आहे. पुढे मेलबर्न (26 ते 30 डिसेंबर) व सिडनी (3 ते 7 जानेवारी) येथे दुसरा व चौथा कसोटी सामना होईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक चिंता संपुष्टात याव्यात, यासाठी देखील त्यांच्यासाठी ही मालिका होणे विशेष महत्त्वाचे आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयाच्या माध्यमातून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 300 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळेल, असेही वृत्त आहे.