कोविड-19 महामारीविरोधातील लढय़ात भारताच्या पावलांची जगभरात प्रशंसा होत आहे. जागतिक नेत्यांनी भारतातील वैज्ञानिक पुढाकार तसेच निर्णयांचे कौतुक केले आहे. भारतात महामारी संपुष्टात आणण्यासाठी घेण्यात येत असलेल्या निर्णयांचे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केले आहे. कोविड-19 विरोधातील जागतिक लढय़ात भारताचे पुढाकार तसेच लसनिर्मितीची क्षमता पाहून आनंद होत असल्याचे गेट्स यांनी ट्विट करत म्हटले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालयालाही त्यांनी टॅग केले आहे.
भारताकडून निर्णायक पाऊल
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस यांनी कोरोना लसीवरून भारताचे कौतुक केले आहे. जगातील सर्वात मोठा लसउत्पादक म्हणून भारताने महामारी उच्चाटनाचा स्वतःचा संकल्प पूर्ण केला आहे. भारत सातत्याने निर्णायक पावले उचलत आहे. प्रभावी लसीच्या वापराद्वारे सर्वच ठिकाणांवरील दुर्बल लोकांना वाचविण्याचे लक्ष्य प्राप्त करता येणार असल्याचे टेड्रोस म्हणाले.