वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या नौकानयनपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली असून ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदाच चार नौकानयनपटूंनी पात्रता मिळविली आहे. ओमानमध्ये सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत विष्णू सरवानन आणि गणपती चेंगाप्पा व वरुण ठक्कर या जोडीने गुरुवारी हे यश मिळविले. त्याआधी बुधवारी नेत्रा कुमाननने ऑलिम्पिक पात्रता मिळविणारी भारताची पहिली महिला सेलर होण्याचा मान मिळविला.
नेत्रा कुमाननने मुसानाह ओपन चॅम्पियनशिपमध्ये लेसर रेडियल इव्हेंटमध्ये हे यश मिळविले. ही स्पर्धा आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ऑलिम्पिकमध्ये आता भारताचे चार सेलर्स तीन प्रकारांत खेळताना प्रथमच दिसणार आहेत. यापूर्वीच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने एकाच प्रकारात भाग घेतला होता. मात्र चारवेळा दोन सेलर्सनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ‘नवा इतिहास घडलाय यात शंकाच नाही. भारताचे चार सेलर्स प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. आजवरची ही भारताची सर्वोच्च कामगिरी आहे. याशिवाय तीन प्रकारात खेळण्याचीदेखील ही पहिलीच वेळ असेल,’ असे भारतीय याटिंग संघटनेचे सहसरचिटणीस कॅप्टन जीतेंद्र दीक्षित म्हणाले.
भारतीय सेलिंग पथकाचे प्रशिक्षक टॉमस यानुझेवस्की म्हणाले की, ‘या खेळाडूंनी, त्यांच्या पालकांनी आणि प्रशिक्षकांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाचे हे फलित आहे. हा ऐतिहासिक दिवस निर्माण केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी भारतीय सेलिंग क्षेत्राला नव्या उंचीवर नेले आहे,’ असे ते ओमानहून बोलताना म्हणाले. त्यांनी क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय याटिंग संघटनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत. ‘मला असे वाटते की, भारतीय सेलिंग क्षेत्रात या यशाने नव्या युगाची सुरुवात झाली आहे. खेळाडू आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्वच घटक खूप मोलाचे ठरले असून आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख निर्माण होण्याची वेळ आली आहे,’ असेही ते म्हणाले.
गुरुवारी सरवानने सर्वप्रथम ऑलिम्पिक पात्रता मिळविली. त्याने लेसर स्टँडर्ड क्लास इव्हेंटमध्ये एकंदर दुसरे स्थान मिळवित त्याने हे यश मिळविले. त्यानंतर चेंगाप्पा व ठक्कर या जोडीने 49 क्लासमध्ये सर्वाधिक गुण मिळवित पहिले स्थान पटकावत पात्रता मिळविली. या जोडीने 2018 मध्ये इंडोनेशियात आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही ट्विटच्या माध्यमातून नेत्रा कुमानन, केसी गणपती, वरुण ठक्कर यांचे अभिनंदन केले आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली महिला बनलेल्या नेत्राचा विशेष अभिमान वाटतो. आपले खेळाडू सर्वच क्रीडा प्रकारात ठसा उमटवत आहेत, असे ते म्हणाले.
यापूर्वी भारताचे दोन सेलर्स चार वेळा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. पण ते एकाच प्रकारात सहभागी झाले होते.