ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्यासाठी नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला भारताने शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचे 11 सैनिक मारले गेले. तसेच त्यांचे बंकर्स आणि लॉंच पॅड्सही उध्वस्त करण्यात आले. भारताच्या प्रत्युत्तराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान झाल्याचे तेथील स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात नीलम, लीपा आणि मुजफ्फराबाद क्षेत्रातील नौसेरा सेक्टरमध्ये मोठे नुकसान झाले आहे. नीलम खोऱ्यात भारताकडून आतापर्यंतचे सर्वात मोठं प्रत्युत्तर देण्यात आल्याचे पाकव्याप्त काश्मीरचे सिव्हिल डिफेन्स आणि आपात्कालिन व्यवस्था प्रकरणांचे सेक्रेटरी सय्यद शाहिद मोहयिद्दीन कादरी यांनी म्हटले आहे.
पाक सैन्याने शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळच्या डावर, केरन, उरी आणि नौगामसह काही क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गोळीबार आणि तोफांचा मारा करून जाणीवपूर्वक नागरी वसाहतींना लक्ष्य केले होते. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.