आज कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील मानवी समाजाचे जीवन असंख्य संकटांनी ग्रस्त झालेले आहे. भारताबरोबरच अमेरिका, ब्राझिलसारख्या देशात मृत्यूचे अक्षरशः थैमान चालू आहे. आपल्या देशात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या विलक्षण रितीने वाढत चाललेली असून मृत्यूमुखी पडणाऱयांचे प्रमाण आजच्या घडीस चिंतेचा विषय बनलेला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या कोरोनाग्रस्तांची स्थिती चर्चेत आलेली आहे. एकेकाळी आपल्या देशाला औषधी वनस्पतींचा समृद्ध आणि संपन्न वारसा लाभला होता परंतु आम्ही पारंपरिक वनौषधींचे ज्ञान टिकविण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून बेफिकीर राहिल्या कारणाने आज हे बरेच ज्ञान इतिहासजमा झालेले आहे. आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्याच्या दृष्टीने पिढय़ा न् पिढय़ापासून वनौषधी महत्त्वाचे योगदान करत होती. आज हळद, आले, लसूण, तुळस, अमृतवेल, गवती चहा, कोरफडसारख्या वनस्पती माणसाच्या शरीरात प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करत असल्याने बाजारपेठेत त्यांच्या खरेदी-विक्रीत प्रचंड वाढ झालेली आहे.
आदीमानवाचे जीवन प्रदीर्घकाळ निसर्गावर अवलंबून असल्या कारणाने त्याचा अन्नप्राप्तीच्या दृष्टीने वनस्पतीकडे संबंध आला. प्रारंभी अन्न पुरविणारी वनस्पती कालांतराने त्याला वस्त्र, निवारा पुरविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याची जाणीव झाली. अन्न सेवनातील वापरामुळे अशा वनस्पतींच्या अंगी वास करणाऱया असंख्य औषधीतत्त्वांचे त्याला ज्ञान अवगत झाले. विभिन्न व्याधींवर गुणकारी आणि अन्न सेवनाद्वारे पोषक तत्त्वे देणाऱया वनस्पतींत त्याने फरक करायला प्रारंभ केला. वनस्पती आणि मानव यांच्यातील हे संबंध वृद्धिंगत झाले आणि त्यामुळे काही वनस्पतींचा प्रयोग औषध म्हणून करण्याच्या दृष्टीने कल वाढत गेला. हिमालयाच्या, पूर्व आणि पश्चिम घाटांच्या पर्वत रांगात वनौषधींचे वैभव आपल्या देशाला लाभलेले आहे. निसर्गाने आपल्याला जैविक संपदेचा खूप वैविध्यपूर्ण असा वारसा दिलेला आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून या वनौषधींचा उपयोग केला जातो.
भारत, इजिप्त, चीन, ग्रीक, सिरिया, रोम या देशातल्या ग्रंथात सुमारे 5,000 वर्षांपूर्वी वनस्पतींचा औषधी गुणधर्मासाठी वापर केला जात असल्याचे उल्लेख आढळतात. आपल्या देशात आयुर्वेद, सिद्ध, युनानी, योग तसेच नैसर्गिक उपचार पद्धतीत वनस्पतींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. वेगवेगळय़ा रोगांच्या उपचारांसाठी तसेच आरोग्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वनौषधींचा वापर केला जातो. रोगांच्या उपचारार्थ वनस्पतींच्या विविध भागांचा आणि स्वदेशी औषधोपचार पद्धतीत वापर करण्याची लोकपरंपरा आपल्या देशात रूढ आहे परंतु त्या ज्ञानाचा शास्त्रीयदृष्टीने अभ्यास आणि संशोधन केले जात नसल्याने त्यांच्या गुणधर्मांना मान्यता लाभण्याच्या कार्यात अडथळे येत असतात.
विश्व आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार जगातील 80 टक्के लोकसंख्या वनस्पतींतल्या औषधी तत्त्वांचा वापर करत असून आरोग्याच्या प्राथमिक समस्यांसाठी त्यांचा प्रयोग केला जातो. आपल्या देशातल्या अन्न संस्कृतीने वनस्पतींतल्या पोषक आणि औषधी तत्त्वांची पूर्वापार दखल घेतलेली होती आणि त्यामुळे त्यांच्यासाठी अन्न हे केवळ उदरभरण नव्हे तर आरोग्यवर्धक आणि संरक्षक असल्याची जाणीव होती. गोव्यासारख्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यातल्या ‘शीत-कडी’साठी वनस्पतीतल्या विभिन्न तत्त्वांचा कसा वापर करावा याचे पारंपरिक ज्ञान पिढय़ा न् पिढय़ांनी जतन केलेले आहे. बांगडय़ांची आमटी तयार करताना हळदीचा तसेच तिरफळांचा कसा वापर करावा, खतखते करताना मसाल्यांबरोबरच कंदमुळांचा उपयोग कसा करावा, कोकमच्या रसापासून वेगवेगळय़ा प्रकारच्या सोलकढींची निर्मिती कशी करावी आणि त्याचे सेवन कधी करावे याची जाणीव गोवेकरांना आजही आहे. कोकम, चिंच, ओटम याचा कधी आणि कसा वापर करावा याचे ज्ञान परंपरेद्वारे लोकांना लाभले होते आणि त्यामुळे मसालेदार किंवा मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सोलकढी हमखास घेतली जाते.
शाकाहारी खाद्यपदार्थांत बरीच पोषक तत्त्वे तसेच मानवी शरीराला रोगप्रतिकारक शक्ती देण्याची क्षमता असते. विषाणूरोधक, कर्करोग प्रतिबंधक, जिवाणुरोधक तसेच बुरशीरोधक तत्त्वांची प्राप्ती अशी घटकांपासून होत असते आणि त्यामुळे पारंपरिक सण उत्सवात कधी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करावा याचे नियम ठरविले होते. गोव्यातील वेळीप आदिवासी जमातीत भाद्रपद महिन्यात ‘कोडवा परब’ नावाचा जेव्हा सण साजरा केला जातो तेव्हा त्याच्या पूर्वसंध्येला गावातील देवराईत जाऊन वनौषधी आणली जाते आणि देवळातून गावातल्या कुटुंबांना त्याचे वाटे करून दिले जातात. या सणाच्या सकाळी न्याहारी घेण्यापूर्वी रानातील विविध वनस्पतींच्या पाने, फुले तसेच कंदमुळांपासून तयार केलेले कडवट चव असलेल्या औषधांचे द्रवरूपात सेवन केले जाते. आजही भारतातल्या असंख्य जंगली निवासी जाती जमातींनी विविध रोगांवर प्रभावी गणल्या जाणाऱया वनौषधींचा वापर चालू ठेवलेला आहे.
ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडात चरकसंहिता आणि सुश्रुतसंहितेत सुमारे सातशे वनस्पतींचे वर्णन केलेले आहे. भारतीय आयुर्वेद औषध प्रणालीत निरोगी आरोग्य आणि सुदृढ जीवनशैलीसाठी विविध वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांना पूर्वापार प्राधान्य दिलेले आहे. आजही आपल्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात विविध रोगांवर उपचार करण्यासाठी सुमारे 7,500 वनस्पतींचा उपयोग केला जातो. सर्पगंधा, अश्वगंधा, अमृतवेल, हिरडा, बेहडा, आवळा, कडुलिंबू, हळद, आले, अर्जुन, कोरफड, मिरी, लवंग, दालचिनी, वेलदोडे, लसूण, जिरे, प्राजक्त, अडुळसा, तुळस, गवती चहा आदी वनस्पतीत असलेल्या औषधी तत्त्वांचा भारतीय समाजाने पूर्वापार लाभ घेतला आणि मधुमेह, कर्करोग, ह्रदयरोग, अतिसार, चर्मरोगसारख्या रोगांपासून दिलासा मिळविलेला आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वनौषधींच्या पारंपरिक ज्ञानस्रोताचा लाभ घेऊन औषध विज्ञान विकसित केले पाहिजे.
राजेंद्र पां. केरकर
(लेखक पर्यावरण विषयाचे व्यासंगी अभ्यासक आहेत)