प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे प्रतिपादन : नरेंद्र मोदींचे जोरदार कौतुक, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांवर ताशेरे
वृत्तसंस्था/ कोझीकोड
अत्यंत मेहनती आणि स्वतःच निर्णय घेणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ‘पाचव्या पिढीचे वारसदार’ असलेल्या राहुल गांधी यांना भारतीय राजकारणात कुठलीच संधी मिळणार नाही. केरळच्या जनतेने राहुल गांधी यांची खासदार म्हणून निवड करून विनाशकारी काम केले आहे. केरळच्या जनतेने 2024 मध्ये राहुल गांधी यांना पुन्हा निवडून आणल्यास नरेंद्र मोदींना पुन्हा वरचढ ठरणार असल्याचे प्रतिपादन गुहा यांनी केले आहे.
कोझीकोड येथे आयोजित केरळ साहित्य महोत्सवात बोलताना गुहा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. वैयक्तिक पातळीवर राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. ते अत्यंत शांत आणि सुस्वभावी आहेत, पण भारतातील तरुणाई पाचव्या पिढीचे वारसदार इच्छित नाही. 2024 मध्ये केरळच्या जनतेने राहुल गांधी यांना पुन्हा निवडून आणल्यास नरेंद्र मोदींनाच मदत होणार असल्याचे उद्गार गुहा यांनी काढले आहेत.
दयनीय कौटुंबिक पक्ष
काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य लढय़ाच्या काळातील एक ‘महान पक्षा’पासून खालावत आता ‘दयनीय कौटुंबिक कंपनी’ ठरला आहे. भारतातील हिंदुत्वाचा प्रसार तसेच कट्टर राष्ट्रवादासाठी काँग्रेसच कारणीभूत आहे. केरळने भारतासाठी अनेक उत्तम कार्ये केली आहेत, पण राहुल गांधींना संसदेत पाठवून विनाशकारी काम केल्याचे गुहा यांनी म्हटले आहे.
मोदींची प्रशंसा
नरेंद्र मोदी खऱया अर्थाने पुढे आहेत कारण ते राहुल गांधींसारखे नाहीत. स्वतःच्या मेहनतीने मोदींनी हा पल्ला गाठला आहे. त्यांनी 15 वर्षांपर्यंत गुजरातमध्ये सरकार चालविले असून त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे. अत्यंत कष्टाळू असलेले मोदी कधीच युरोपमध्ये सुटी घालविण्यासाठी जात नाहीत, अशी टिप्पणी गुहा यांनी केली.
काँग्रेस पक्षाची दुरावस्था
भारत देश लोकशाहीवादी होत असून सामंतवाद कमी होत चालला आहे. गांधी कुटुंबाला हे स्थित्यंतरच समजत नसावे. सोनिया गांधी दिल्लीत असून त्यांच्या पक्षाचा आकार आपुंचित होत असला तरीही त्यांच्या अवतीभोवतीचे नेते त्यांना अद्याप ‘बादशाह’च ठरवत आहेत. राहुल गांधी यांच्यामुळेच नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरू यांचा मुद्दा उपस्थित करतात आणि नेहरूंनी ‘चीनमध्ये, काश्मीरमध्ये केलेल्या चुकांचा’ उल्लेख करतात. राहुल गांधी राजकीय सारिपाटावरून दूर झाल्यास मोदींना स्वतःची धोरणे तसेच अपयशाबद्दल बोलणं भाग पडणार असल्याचा दावा गुहा यांनी केला आहे.
सोनिया गांधी ठरल्या लक्ष्य
राहुल गांधी यांनी अधिक समजंसपणा, मेहनत दाखवत युरोपमध्ये सुटी घालविली नसती तरीही पाचव्या पिढीचे शासक म्हणून ते स्वतःच्या मेहनतीने पुढे जाणाऱया मोदींसमोर टिकले नसते. सोनिया गांधी ‘संपुष्टात आलेल्या मुघल वंशा’ची आठवण करून देत आहेत. मुघल शासक स्वतःच्या साम्राज्याच्या स्थितीबद्दल अनभिज्ञ होते. याचप्रकारे सोनियांना काँग्रेसच्या दारुण अवस्थेची परिपूर्ण कल्पना नसावी. तसेच काँग्रेस नेते सोनियांना पक्षाच्या सद्यस्थितीची जाणीव करून देणे टाळत असल्याचे गुहा यांनी म्हटले आहे