केंदशासित प्रदेश असलेल्या लेह-लडाखमधील चांगथांग वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये भारतातील पहिले हानले डार्क स्काय रिझर्व्ह (रात्रीचे आकाश अभयारण्य) येत्या तीन महिन्यात साकारणार आहे. या भागात ऍस्ट्रॉनॉमी टुरिझमला चालना देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स येथील इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनच्या मानकांना अनुसरून हे अभयारण्य साकारणार आहे.
केंद्रशासित लेह-लडाख प्रदेश प्रशासन, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स (IIA) यांनी डार्क स्काय रिझर्व्ह लाँच करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी केली आहे.
अगणित वर्षांचा प्रवास
आकाश हे प्रत्येकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. सूर्य-चंद्र आणि तारे यांचा अगणित वर्षांचा प्रवास आणि या प्रवासात मानवी जीवनाशी जडलेले नाते अनन्यसाधारण आहे. खगोलशास्त्रातून हे सारे विश्व अभ्यासता येते. आपण अनेक वर्षांपूर्वी सहजपणे रात्रीचे नेत्रदीपक तारांकित आकाश पाहू शकत होतो. मात्र, आता जगभरातील कृत्रिम झगमगाटामुळे आकाशगंगा अनुभवयाला मिळणे कठीणच. रात्रीच्या वेळचा कृत्रिम प्रकाशाचा होणारा मारा पाहता विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बिघडवत आहे. त्याचा आपल्या पर्यावरणावर, सुरक्षिततेवर, ऊर्जा वापरावर आणि आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे.
रात्रीचे आकाश अन् मानवी भावभावना
रात्रीच्या आकाशाचा अनुभव घेतल्याने दृष्टिकोन, प्रेरणा मिळते. आपल्याला मानवतेवर आणि विश्वातील स्थानावर विचार करण्यास हे आकाश प्रवृत्त करते. वैज्ञानिक शोधाचा इतिहासात आणि मानवी कुतूहल जागविण्यात रात्रीच्या आकाशाचे महत्त्व फार आहे. मानवी भावभावना जागविण्याचे काम रात्रीचे आकाश (डार्क स्काय) करते. याच कारणांमुळे इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनने 2001 मध्ये रात्रीच्या आकाशाच्या उत्तम अनुभवासाठी आंतरराष्ट्रीय गडद आकाशातील ठिकाणे कार्यक्रमाची घोषणा केली. तेव्हापासून जगभरातील शंभरहून अधिक उद्याने, समुदाय, राखीव क्षेत्र आणि अभयारण्ये यांना आंतरराष्ट्रीय गडद आकाश स्थान मिळाले आहे.
काय आहे डार्क स्काय रिझर्व्ह?
इंटरनॅशनल डार्क स्काय रिझर्व्ह सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्र असते. ज्यामध्ये तारांकित रात्री आणि निशाचर वातावरणाचा अनुभव घेता येतो. आकाशाची गुणवत्ता आणि नैसर्गिक अंधाराचे किमान निकष पूर्ण करणारे क्षेत्र निवडले जाते. IDA नुसार गडद आकाश राखीव किमान 700 चौरस कि. मी. असावे.
प्रकाश प्रदूषण (लाईट पोल्युशन) हा औद्योगिकरणाचा दुष्परिणाम आहे. तेथील बाह्य आणि अंतर्गत प्रकाश व्यवस्था, जाहिराती, व्यावसायिक मालमत्ता, कार्यालये, कारखाने, पथदीप यात विजेचा अतिरिक्त वापर होतो. रात्री वापरली जाणारी बरीच बाह्य प्रकाशयोजना अतितेजस्वी, घातक आणि बऱयाच बाबतीत अनावश्यक असते. प्रकाशित करू इच्छित असलेल्या वस्तू आणि क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी तो आकाशात टाकून वाया जात आहे.
आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय
पृथ्वीवरील बहुसंख्य लोक प्रकाश-प्रदूषित आकाशाखाली राहत असल्याने जास्त प्रकाश हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे. शहरी किंवा उपनगरी भागातील लोकांना या प्रकारचे प्रदूषण पाहण्यासाठी रात्री बाहेर जाऊन आकाशाकडे पाहावे लागेल. 2016 च्या ग्राऊंडब्रेकिंग वर्ल्ड ऍटलस ऑफ आर्टिफिशियल नाईट स्काय ब्राइटनेसनुसार जगातील 80 टक्के लोकसंख्या स्कायग्लोखाली राहते. युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये 99 टक्के जनता नैसर्गिक रात्रीचा अनुभव घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
1974 पासून पर्यटकांसाठी खुले
लेह-लडाख हे क्षेत्र पर्यटकांसाठी 1974 पासून खुले करण्यात आले. तेव्हापासून जगभरातील पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. कारण तेथील सुंदर निसर्ग आणि संस्कृती. ऍडव्हेंचर पर्यटनालाही तेथे मोठय़ा प्रमाणात वाव आहे. तेथील अर्थव्यवस्थाही पर्यटनावर अवलंबून आहे. तेथे जवळपास 250 हून अधिक हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस आहेत. पॅन्गॉन्ग सरोवर आणि खारदोंगला येथील जगातील सर्वात उंच रस्ता (18 हजार 350 फूट) हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाचा प्रकल्प
चांगथांग शीत मरुस्थळ (वाळवंट) चार हजार स्क्वेअर किलोमीटर परिसरात आहे. ते समुद्रसपाटीपासून 4500 मीटर उंचीवर आहे. दुर्मीळ अशा प्राणी, वनस्पती आणि किटकांचे वास्तव्य या वाळवंटात आहे. याच परिसरात आता डार्क स्काय रिझर्व्ह होत आहे. पर्यटनदृष्टय़ा हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
नैसर्गिक लयीवर परिणाम
पृथ्वीवरील जीवन हे प्रकाश आणि अंधाराच्या लयीत अस्तित्वात आहे. जे केवळ सूर्य, चंद्र आणि ताऱयांच्या प्रकाशामुळे निर्माण झाले होते. आता कृत्रिम प्रखर दिवे अंधारावर मात करतात. शहरे रात्रीच्या वेळी चमकतात. दिवस-रात्रीची नैसर्गिक पद्धत बिघडते. पर्यावरणाचे संतुलनही बिघडते. या नैसर्गिक चक्रातील बदल पर्यावरणाला हानी पोहोचवतो. प्रकाश प्रदूषणाचा परिणाम प्रत्येकावरच होतो. या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी व्यावहारिक उपाय लागू करता येण्यासारखे आहेत. प्रकाश प्रदूषण हे अन्य प्रकारच्या प्रदूषणांप्रमाणेच रिव्हर्सेबल आहे. रात्रीच्या वेळी स्वतःच्या घरातील प्रकाश कमी करून सुरुवात करू शकतो.
कृत्रिम दिव्यांचा परिसंस्थेत व्यत्यय
कोटय़वधी वर्षांपासून जीवसृष्टी पृथ्वीच्या दिवस आणि रात्रीच्या अंदाजे चक्रावर अवलंबून आहे. सर्व वनस्पती आणि प्राण्यांच्या डीएनएमध्ये ते अंतर्भूत आहे. रात्रीचा दिवस करून मानवाने हे चक्र विस्कळीत केले आहे. पुनरुत्पादन, पोषण, झोप आणि भक्षकांपासून संरक्षण यासारख्या जीवन टिकवून ठेवणाऱया वर्तनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनस्पती आणि प्राणी पृथ्वीच्या प्रकाश आणि अंधार या दैनंदिन चक्रावर अवलंबून असतात. वैज्ञानिकांच्या मते रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा उभयचर, पक्षी, सस्तन प्राणी, कीटक आणि वनस्पतींसह अनेक प्राण्यांवर नकारात्मक आणि घातक परिणाम होतो. कृत्रिम दिवे जगाच्या परिसंस्थेत व्यत्यय आणतात. निशाचर प्राणी दिवसा झोपतात आणि रात्री सक्रिय असतात. प्रकाश प्रदूषण रात्रीचे दिवसात रुपांतर करून रात्रीच्या वातावरणात बदल करते. निशाचर प्राण्यांच्या दृष्टीने ‘कृत्रिम प्रकाश हा मानवाने त्यांच्या वातावरणात केलेला सर्वात तीव्र हस्तक्षेप दर्शवतो.’ शिकारीसाठी भक्ष्यक प्रकाशाचा वापर करतात आणि शिकारी प्रजाती अंधाराचा आच्छादन म्हणून वापर करतात. शहरांजवळील ढगाळ आकाश आता 200 वर्षांपूर्वीच्या तुलनेत शेकडो किंवा हजारो पट अधिक उजळ आहे. निशाचर पर्यावरणावर याचा तीव्र परिणाम झाला आहे.
ओलसर वस्तीवरही परिणाम
कृत्रिम दिव्यांच्या चकाकीमुळे बेडूक आणि टॉड्स यासारख्या उभयचर प्राण्यांचे निवासस्थान असलेल्या ओलसर वस्तीवरही परिणाम होऊ शकतो; ज्यांचे रात्रीच्या वेळी ‘क्रोकिंग’ प्रजनन विधीचा भाग आहे. कृत्रिम दिवे या निशाचर क्रियाकल्पांमध्ये व्यत्यय आणतात. पुनरुत्पादनात हस्तक्षेप करतात आणि लोकसंख्या कमी करतात. कृत्रिम दिवे समुद्री कासवांच्या पिलांना मृत्यूकडे नेऊ शकतात. समुद्री कासव समुद्रात राहतात. परंतु रात्री समुद्रकिनाऱयावर अंडी उबवतात. पिले समुद्रावरील चमकदार क्षितिज शोधून समुद्राकडे जात असतात. कृत्रिम दिवे त्यांना समुद्रापासून दूर खेचतात. एकटय़ा फ्लोरिडामध्ये दरवर्षी अशा प्रकारे लाखो पिले मरतात.
पक्ष्यांनाही विचलित करतात कृत्रिम दिवे
रात्री स्थलांतर करणारे किंवा शिकार करणारे पक्षी चंद्रप्रकाश आणि ताऱयांच्या प्रकाशाने मार्गक्रमण करत असतात. कृत्रिम प्रकाशामुळे ते शहरांच्या धोकादायक रात्रीच्या लँडस्केपकडे भटकू शकतात. दरवर्षी लाखो पक्षी अनावश्यकपणे प्रकाशित इमारती आणि टॉवर्सला आदळून मरतात. स्थलांतरित पक्षी योग्य वेळेनुसार हंगामी वेळापत्रकांच्या संकेतांवर अवलंबून असतात. कृत्रिम दिवे त्यांना विचलित करतात. घरटे बांधणे, चारा घालणे आणि त्यांच्या अन्य दैनंदिन वर्तनासाठी आदर्श हवामान परिस्थिती कृत्रिम प्रकाशामुळे गमावण्याचा धोका आहे. अनेक कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात. परंतु कृत्रिम दिवे घातक आकर्षण निर्माण करू शकतात. कीटकांची घटती लोकसंख्या अन्न किंवा परागीकरणासाठी कीटकांवर अवलंबून असलेल्या सर्व प्रजातींवर परिणाम करते. काही भक्षक त्यांच्या फायद्यासाठी या आकर्षणाचा गैरफायदा घेतात.
प्रेरणादायी आकाश
रात्रीचे नैसर्गिक वातावरण हे पृथ्वीतलावरील सर्वांसाठी एक मौल्यवान साधन आहे. परतु अनियंत्रित बाहय़ प्रकाशाच्या माऱयाने आकाशातील तारे लपले जातात. रात्रीबद्दलची आपली धारणा बदलत आहे. आतापर्यंत रात्रीचे नैसर्गिक आकाशाच आपल्याला प्रेरणा देत आले आहे. रात्रीचे सुंदर आकाश विज्ञान, धर्म, तत्वज्ञान, कला आणि साहित्य यांना प्रेरणा देते, याचे अनेक दाखले आहेत. अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यात आकाशाला स्थान दिले आहे.
प्रकाश प्रदूषणाचा पर्यावरणावर गंभीर परिणाम
हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण याबाबत आपण आजवर ऐकत आलो आहोत. परंतु प्रकाशाचे प्रदूषणही असू शकते. विजेचा झगमगाट निसर्गाला हानी पोहोचवू शकतो. कृत्रिम प्रकाशाचा अयोग्य किंवा गरजेपेक्षा जादा वापर म्हणजे प्रकाशाचे प्रदूषणच होय. त्याचा मानव, वन्यजीव आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
लिक्वीड मिरर टेलिस्कोप उत्तराखंडमध्ये
भारतातील पहिला लिक्वीड मिरर टेलिस्कोप अलीकडेच उत्तराखंड येथील पहाडी देवस्थळ येथे बसविण्यात आला आहे. नजीकच्या काळात या हायटेक दुर्बिणीचे निष्कर्ष निघू शकतील. या टेलिस्कोपसाठी नैनिताल येथील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट ऍण्ड ऑब्झर्व्हेशनल सायन्सेसचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच कॅनडा, बेल्जियम, पोलंड आणि उज्बेकिस्तान या देशांचेही सहकार्य लाभले आहे. आकाशाच्या दीर्घकालीन अभ्यासाच्या दृष्टीने हा टेलिस्कोप बनविण्यात आला आहे. ज्यामध्ये मर्क्युरीचा वापर करण्यात आला आहे. एकप्रकारे हा टेलिस्कोप आरशाप्रमाणेही काम करतो. यावर रिफ्लेक्ट होणाऱया प्रकाशाची प्रतिमा घेऊन त्याचा अभ्यास केला जाणार आहे.
येत्या तीन महिन्यात लडाखमध्ये भारतातील पहिले ‘रात्रीचे आकाश अभयारण्य’ तयार केले जाईल. चांगथांगचा एक भाग म्हणून प्रस्तावित डार्क स्काय रिझर्व्ह लडाखमधील हानले येथे स्थित असेल. हानले हे लडाखच्या थंड वाळवंटी प्रदेशात आहे. कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपापासून हे क्षेत्र दूर आहे. तेथे स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान वर्षभर असते. लेह-लडाख प्रदेश प्रशासन, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स या तिन्ही संस्था एकत्रितपणे काम करतील.
– डॉ. जितेंद्र सिंह, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, भारत सरकार
संकलन ः राजेश मोंडकर, सावंतवाडी