42 वर्षांपासून थांबली नाही एकही रेल्वे
जगात अनेक रहस्यं असून त्यांची आतापर्यंत उकल करता आलेली नाही. यातील एक रहस्य भूत-प्रेत किंवा आत्म्यांच्या अस्तित्वासंबंधी आहे. काही लोक भूत-प्रेतांवर विश्वास ठेवत नाहीत. तर काही जण आत्मा असल्याचा दावा करत आहेत. जगातील काही ठिकाणी भूतांचा वास असल्याचा दावाही काही लोक करत असतात.
भारतासह जगातील अनेक ठिकाणं भुताटकीयुक्त असल्याचे मानली जातात. भारतात एका रेल्वेस्थानकाला भुताटकीयुक्त मानले जाते, तेथे लोकच नव्हे तर प्रशासनही जाण्यास घाबरत होते. याचमुळे या रेल्वेस्थानकावर कित्येक वर्षांपासून रेल्वे थांबत नव्हती.
हे रेल्वेस्थानक पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्हय़ात असून त्याचे नाव बेगुनकोडोर रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकाचे नाव सोशल मीडियावरील भारताच्या ‘10 भुताटकीयुक्त स्थानकां’च्या यादीत सामील आहे. हे रेल्वेस्थानक 1960 मध्ये सुरू झाले होते, प्रारंभीची काही वर्षे सर्वकाही सुरळीत राहिले, पण नंतर तेथे विचित्र घटना घडू लागल्या. 1967 मध्ये बेगुनकोडोरच्या एका रेल्वेकर्मचाऱयाने स्थानकावर एका महिलेचे भूत पाहिल्याचा दावा केला.
येथील स्टेशनमास्तरचा ‘पांढऱया साडीतील एक महिल’ पाहिल्यावर मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतो. तसेच या महिलेचा मृत्यू याच स्थानकावर एका रेल्वेदुर्घटनेत झाल्याची अफवा पसरली. प्रारंभी लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही.
त्यानंतर स्टेशनमास्तर आणि त्याचे कुटुंब रेल्वे क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळून आले. या मृत्यूंमागे महिलेच्या भूताचा हात असल्याचे लोक म्हणू लागले. सूर्यास्त झाल्यावर तेथून एखादी रेल्वे धावू लागल्यास महिलेचे भूत रेल्वेसोबत धावायचे असे लोकांचे म्हणणे होते. कधीकधी भूत रेल्वेला मागे टाकून जायचे आणि अनेकदा भूत रेल्वेरुळावर नाचताना पाहिल्याचा दावा करण्यात येत होता.
या भयावह घटनांनंतर लोक तेथे जाण्यास घाबरू लागले. भीतीमुळे कुठलाच प्रवासी या स्थानकावर उतरू इच्छित नव्हता. यामुळे पूर्ण स्थानक निर्जन ठरले. कुठलाच रेल्वे कर्मचारी या स्थानकावर सेवा बजावू इच्छित नव्हता. यामुळे 42 वर्षांपर्यंत स्थानक बंद राहिले. सुमारे 42 वर्षांमध्ये एकही रेल्वे येथे थांबली नाही. या स्थानकावरू जात असताना रेल्वेचा वेग वाढविला जायचा. 2009 मध्ये ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यावर त्यांनी स्थानक पुन्हा सुरू करण्याचा निर्देश दिला होता.