पाकिस्तानमधील आशिया चषक स्पर्धेत सहभागी होण्याची अट, भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार
लाहोर / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदा सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमधील आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी आपला संघ पाठवला नाही तर भारतात 2021 साली होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेवर आमचा संघ बहिष्कार टाकेल, असा थेट इशारा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) शनिवारी दिला. पीसीबीचे सीईओ वासिम खान यांनी मंडळाची भूमिका स्पष्ट केली.
यंदाची आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार आहे. आम्ही या स्पर्धेचे हक्क बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे अजिबात दिलेले नाहीत, असेही वासिम खान यांनी स्पष्ट केले. भारताने ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यावर आक्षेप घेतल्यानंतर ती पाकिस्तानऐवजी बांगलादेशमध्ये आयोजित केली जावी आणि त्या बदल्यात बांगलादेशने आपला संघ पाकिस्तान दौऱयावर पाठवावा, अशी चर्चा सुरु होती. पण, त्यात काहीही तथ्य नसल्याचा दावा वासिम खान यांनी येथे केला.
‘आम्हाला आशिया चषक टी-20 स्पर्धेचे यजमानपद आशिया क्रिकेट समितीने बहाल केले आहेत आणि हे यजमानपद आम्ही त्यांच्याकडे सोपवू शकत नाही. तसा आम्हाला कोणताही अधिकार देखील नाही’, असे ते म्हणाले. अर्थात, भारताची हरकत असल्याने अन्य दोन ठिकाणांबद्दल विचार सुरु असल्याचे मात्र त्यांनी येथे कबूल केले.
भारतीय क्रिकेट संघाने 2008 नंतर एकदाही पाकिस्तान दौरा केलेला नाही. तसेच, 2007 नंतर पाकिस्तानविरुद्ध एकही पूर्ण कसोटी मालिका खेळलेली नाही. पाकिस्तानने 2012 मध्ये मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळण्यासाठी भारत दौरा केला. पण, त्यानंतर तणावपूर्ण परिस्थितीमुळे उभय संघात एकही द्विदेशीय मालिका झालेली नाही. सध्याच्या रुपरेषेनुसार आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असली तरी भारताने आपला संघ पाठवण्याची संमती दर्शवली तरच त्याला मूर्त स्वरुप येईल, हे स्पष्ट आहे.
आफ्रिकेचे पथक पाकला जाणार
दक्षिण आफ्रिकेचा संघ मार्च-एप्रिल महिन्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱयावर जाणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे सुरक्षा पथक फेब्रुवारीत पाकिस्तानमध्ये येत येथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेणार आहे, अशी माहिती वासिम खान यांनी यावेळी दिली. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेनंतर पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही मालिका होणे अपेक्षित आहे.
आयसीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय अधिकाऱयांनी या आठवडय़ाच्या प्रारंभी इस्लामाबाद व लाहोरला भेट दिली असून 2023 ते 2031 या आठ वर्षांच्या कालावधीत आयसीसीच्या किमान तीन स्पर्धांचे यजमानपद पाकिस्तानला मिळावी, यासाठी आपण महत्त्वाकांक्षी असल्याचे ते यावेळी म्हणाले. मेरिलबोन क्रिकेट क्लबचा संघ लाहोरमध्ये चार सामने खेळण्यासाठी येणार असून त्यात मोईन अली, कुमार संगकारा व रवी बोपारा या खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश असेल, याचा त्यांनी शेवटी उल्लेख केला.