‘सीआयआय’च्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, विक्रमी विदेशी गुंतवणूक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात आज उद्योगाभिमुख प्रशासन असून गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम परिस्थिती आहे. प्रशासनातील वेळकाढूपणा संपल्याने निर्णय झटपट होत आहेत. त्यामुळे नव्या उद्योगांना अनुमती आणि इतर प्रमाणपत्रे त्वरेने मिळत आहेत. उद्योजकांनी या सुधारलेल्या परिस्थितीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआयआय या संस्थेच्या परिषदेत मार्गदर्शन करताना केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी परिषदेला संबोधित केले. प्रशासनाची कार्यपद्धती आणि उद्योग विषयक कायदे यांचे मोठय़ा प्रमाणात संधान बांधण्यात आणि उद्योग प्रक्रियग्ना सुसूत्र करण्यात आपल्या सरकारला यश मिळाले आहे. कायदे सोपे करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कायद्याचे जंजाळ दूर
काही वर्षांपूर्वी भारतात उद्योग क्षेत्राला आणि कामगारांना विविध कायद्यांच्या जंजाळात वर्षानुवर्षे अडकून पडावे लागत असे. या जंजाळातून सुटण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा आणि वेळ खर्च होत असे. आता सरकारने अनेक कायद्यांचे एकत्रिकरण करुन प्रक्रिया सुलभ केली आहे. दिवाळखोरी विषयक कायदेही सुलभ आणि प्रक्रिया वेगवान केली. भारतीय प्रशासन हे एकेकाळी दिरंगाई आणि उदासीनतेसाठी प्रसिद्ध होते. साधी कामेही अनावश्यकरित्या प्रलंबित ठेवली जात. आता ही ओळख बदलली असून तत्पर सेवेसाठी आणि वेगवान निर्णयांसाठी प्रशासनाची मानसिकता तयार झाली आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
विक्रमी विदेशी गुंतवणूक
भारत आज उद्योगसुलभतेसाठी (इस ऑफ डुइंग बिझनेस) जगात नाव मिळवत आहे. एकेकाळी शेती व्यवसायाला केवळ उपजिविकेचे साधन आणि पोट भरण्याचा धंदा मानण्याची प्रथा होती. या व्यवसायात लाभ होऊ शकतो हे कोणाला पटत नव्हते. पण आता शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक प्रधाननेशी संलग्न करण्यग्नात येत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय कात टाकत आहे. या सर्व सुधारणांमुळे भारतात आता विक्रमी प्रमाणात विदेशी गुंतवणूक येत असून येत्या काही वर्षात देशाचा कायापाटल होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय वस्तूंना प्राधान्य
एकेकाळी भारतीयांना विदेशी बनावटीच्या वस्तूंचे मेठे आकर्षण होते. तथापि, आता भारतातच उत्तम गुणवत्तेच्या वस्तू बनत असल्याने या मानसिकतेत परिवर्तन होत आहे. याचा लाभ उद्योजकांनी उठवावयास हवा. नवी आणि अनोखी उत्पादने निर्माण करण्यासाठी देशात हजारोंच्या संख्येने स्टार्टअप उद्योग उभे रहात असून यात भारताने मोठी आघाडी घेतली आहे. हा भारतीय उद्योगांसाठी नवा प्रारंभ असून त्याचा उपयोग करुन घ्यावा, असेहीं प्रतिपादन त्यांनी केले.