इशाऱयानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात दहशतवादी हल्ल्यासंबंधी इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून इस्रायलच्या नागरिकांना लक्ष्य केले जाऊ शकते. गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱयानुसार दहशतवाद्यांकडून ज्यूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या इशाऱयानुसार सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
गुप्तचर यंत्रणांनुसार आगामी 6 सप्टेंबरपासून ज्युइश हॉलिडेची सुरुवात होत असून तो अनेक दिवसांपर्यंत चालणार आहे. यादरम्यान मोठय़ा संख्येत ज्यू धर्मीय एकत्र येतात. याच संधीचा लाभ घेत दहशतवाद्यांकडून हल्ला केला जाण्याची शक्यता आहे.
इस्रायलचा दूतावास, कॉन्सुलेट आणि तेथे काम करणारे कर्मचारी, कोशेर रेस्टॉरंट, हॉटेल सिनोगॉसेस, छाबड हाउस, ज्यू समुदाय केंद्र आणि इस्रायली पर्यटक भेट देणाऱया ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील दोनवेळा दिल्लीत इस्रायलशी निगडित लोक आणि संस्थांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे.
तर जानेवारी महिन्यात नवी दिल्लीमध्ये इस्रायलच्या दूतावासाकडून काही अंतरावर आयईडी स्फोट घडविण्यात आला होता, या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून याची चौकशी एनआयए करत आहे. याचबरोबर 13 फेब्रुवारी 2012 रोजी देखील दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दूतावासाच्या कारवर बॉम्बने हल्ला केला होता. या हल्ल्यातील दहशतवादी इराणमधून आल्याचे आणि स्फोटानंतर फरार झाल्याचा खुलासा झाला होता.