सिंगापूरच्या पंतप्रधानांचे शिखर परिषदेत प्रतिपादन
सिंगापूर / वृत्तसंस्था
भारतात सध्या उद्योग व्यवसायांसाठी पूरक वातावरण आहे. अनेक स्टार्टअप कंपन्या उभ्या रहात आहेत. तंत्रज्ञान विकास आणि स्टार्टअपसाठी अनुकूल अशा या परिस्थितीचा लाभ आसियान संघटनेचे देश घेऊ शकतात, अशी भलावण सिंगापूरचे पंतप्रधान ली हॅसिन लूंग यांनी केली आहे. ते शुक्रवारी आसियान शिखर परिषदेच्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करीत होते. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे विचार मांडले होते.
भारताचे साहाय्य आसियान परिषदेशाठी महत्वपूर्ण आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि आरोग्य सेवा यांवर सिंगापूर आसियानचा समन्वयक म्हणून भर देत आहे. आसियान संघटनेचे सदस्य देश भारतात लाभदायक गुंतवणूक करु शकतात. भारतातील सध्याच्या वातावरणाचा लाभ घेऊ शकतात. आसियान देश इंटरऑपरेबल अशा स्वरुपाच्या अर्थव्यवस्थेचा आणि आर्थिक व्यवहारांचा स्वीकार करु शकतात. सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आर्थिक आणि आंतरबँक व्यवहार करणे हे सुरक्षित आणि वेगवान झाले आहे. या तंत्रज्ञानाचा लाभ उठविला जाऊ शकतो. आसियानमधील भारताच्या सहभागाला सिंगापूर अनन्यसाधारण महत्व देतो. सिंगापूर हे नागरी विमानवाहतूक आणि सागरी वाहतुकीचे केंद्र आहे. भारताच्या लसींच्या निर्यातीला सिंगापूरमधील या सुविधांचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आसियानच्या माध्यमातून नवे सहकार्य होऊ शकते. हे सहकार्य दोघांसाठीही लाभदायक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारत आणि सिंगापूर परस्परांच्या सहकार्याने बरीच प्रगती करु शकतात. पुढील वर्ष हे भारत आणि आसियान सहकार्याचे 30 वे वर्ष आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये भारत आणि आसियान संघटना एकमेकांच्या निकट आले आहेत. सिंगापूर आणि भारत यांच्यातील संबंधही बळकट झाले आहेत. नजीकच्या भविष्यकाळात भारत आणि आसियान यांच्यातले सहकार्य अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आसियान संघटनेत 10 देश असून भारत सहकारी भागीदार आहे.