पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’मधून पुन्हा आत्मनिर्भरतेचा संदेश : देशी खेळणी बनविण्याचे ‘स्टार्टअप्स’ना आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या 68 व्या आवृत्तीत भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखविला. याअनुषगांने त्यांनी देशातील खेळणी उद्योगाचा विशेष उल्लेख केला आणि जगात ‘टॉय हब’ बनण्याची क्षमता आणि कौशल्य भारताकडे आहे, याकडे लक्ष वेधले. ‘स्टार्टअप्स’नी एकत्र येऊन संपूर्ण जगासाठी देशी खेळणी बनवावीत, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही मुलांची सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण गोष्टींकडील ओढा यांना चालना देण्याच्या उद्देशाने खेळण्यांवर लक्ष केंदीत करण्यात आले आहे, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. ‘लोकल’ म्हणजेच स्थानिक खेळण्यांसाठी ‘व्होकल’ बनण्याची गरज व्यक्त करताना ते म्हणाले की, खेळण्यांचा जागतिक उद्योग 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याप्तीचा आहे. परंतु त्यात भारताचा वाटा खूपच कमी आहे. तो वाढविण्यासाठी काम करण्याची गरज आहे.
भारताला स्थानिक खेळण्यांची समृद्ध परंपरा आहे. आपल्या देशात असे अनेक प्रतिभावान व कुशल कारागीर आहेत ज्यांच्याकडे चांगली खेळणी तयार करण्याच्या बाबतीत निपुणता आहे. भारतातील काही प्रांत ‘टॉय क्लस्टर्स’ म्हणून विकसित देखील होत आहेत. उदाहरणार्थ कर्नाटकातील रामनगरमधील चन्नपटना, कृष्णा, आंध्र प्रदेश मधील कोंडापल्ली, तामिळनाडूमधील तंजोर, आसाममधील धुबरी, उत्तर प्रदेशातील वाराणसी अशा अनेक ठिकाणांची नावे घेता येतील, असे मोदी म्हणाले. मुलांच्या विकासासाठी खेळणी खूप महत्त्वाची आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी देखील खेळण्यांचे महत्त्व सांगितलेले आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
भारतकेंद्रित कम्प्युटर गेम्स हव्यात
‘स्टार्टअप्स’, नवीन उद्योजक यांनी एकत्र येऊन ज्यांची उपस्थिती बालपणाला दडपण्याऐवजी बहरून टाकेल अशी उत्तम व दर्जेदार खेळणी बनवावीत. पर्यावरणाला अनुकूल खेळणी देखील बनवूया, असे आवाहन मोदींनी पुढे केले. कम्प्युटर गेम्सही खूप प्रसिद्ध आहेत. तरुण आणि ज्येष्ठ दोघेही त्या खेळतात. परंतु त्यापैकी बहुतेकांवर प्रभाव पाश्चिमात्य देशांचा आहे. आपल्याकडे भारतकेंद्रीत गेम्स असल्या पाहिजेत. यासंदर्भात आपण ‘आत्मनिर्भर’ होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकांमध्ये शिस्तीची भावना
पंतप्रधानांनी देशात अपघातग्रस्त ठिकाणी असो किंवा बॉम्बविरोधी पथकाला मदत करण्याच्या बाबतीत असो, कुत्रे बजावत असलेल्या भूमिकेचे कौतुक केले. पुढच्या वेळी कुत्रे पाळण्याचा विचार कराल तेव्हा भारतीय जातींची कुत्री आणा, असे आवाहनही त्यांनी केले. हा सणांचा काळ आहे, पण त्याचबरोबर कोविड-19 च्या परिस्थितीमुळे लोकांमध्ये शिस्तीची भावना देखील आहे निसर्ग आणि आपल्या सणांमध्ये जवळचा संबंध आहे, असे उद्गार मोदी यांनी यावेळी काढले. वेगवेगळय़ा धान्यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याबद्दल त्यांनी शेतकऱयांचे कौतुकही केले.
स्वातंत्र्यलढय़ातील नायकांना प्रकाशझोतात आणा
भारत 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या आणि प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या हजारो, लाखो नायकांच्या योगदानावर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टीने शिक्षकांना त्यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. तरुण पिढीला त्यांच्याविषयी माहिती असणे महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.
सप्टेंबर हा पोषक आहार महिना म्हणून साजरा केला जाणार असून शाळांमध्ये केवळ रिपोर्ट कार्डच नव्हे, तर क्लास मॉनिटर्ससह न्यूट्रिशन कार्ड आणि न्यूट्रिशन मॉनिटर देखील असावेत, असे पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सांगितले.