अफगाण दहशतवाद्यांची घुसखोरी : गुप्तचर संस्थांनी जारी केला अलर्ट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पहिल्यांदा अफगाण दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याची बातमी समोर येत आहे. गुप्तचर संस्थांनी मोठा हल्ला होण्याची शक्मयता व्यक्त करत अलर्ट जाहीर केला आहे. देशातील मोठय़ा सरकारी संस्था आणि भारतीय लष्करी तळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची शक्मयता वर्तवली जात आहे. भारतात घुसखोरी केलेले दहशतवादी सणासुदीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत असून प्लास्टिक लंच बॉक्समध्ये स्फोटके ठेवून गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचा अलर्टही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
भारतात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाला असून गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी पाकिस्तानातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, छोटे गट बनवून देशात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणांनी अफगाण दहशतवाद्यांबाबतही अलर्टही जारी केला आहे. अफगाण दहशतवाद्यांबरोबरच लष्कर-ए-तोयबा, हरकत-उल-अन्सार, हिजबुल मुजाहिद्दीन देखील हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानमधील बदललेल्या परिस्थितीनंतर पहिल्यांदाच गुप्तचर संस्थांनी अफगाण दहशतवाद्यांबाबत अलर्ट जारी केला आहे.
राज्यांना केले सतर्क
पाकिस्तानच्या निकियाल सेक्टरमधून 35 ते 40 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा, हरकत-उल-अन्सार आणि अफगाण दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अलर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच नदीमार्गातून भारतात घुसण्याची दहशतवाद्यांची योजना असल्याची माहितीही गुप्तचर विभागाकडून देण्यात आली. या कटासाठी दहशतवादी, साहित्य आणि पैसा सर्व तयार केले आहे. गुप्तचर यंत्रणांनी सर्व माहिती राज्य पोलिसांना दिली आहे. दहशतवादी हल्ले वेळीच थांबवण्यासाठी लष्करासह पोलीस आणि निमलष्करी दलांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
संशयास्पद ठिकाणी छापे
18 सप्टेंबर 2021 रोजी उरी सेक्टरमधील एका पोस्टमधून पाच अफगाण दहशतवादी भारतात घुसले आहेत. हे पाच दहशतवादी अफगाणिस्तानातून आले आहेत. त्यामुळे ते काश्मीरमधील लोकांमध्ये सहजपणे मिसळू शकत नाहीत. सुरक्षा दले त्यांचा शोध घेत असून सर्व संशयास्पद ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. या घुसखोरीच्या शक्यतेमुळे भारतीय सैन्याकडून उरी सेक्टरमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे.