ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाला रोखण्यात आपण अपयशी ठरत आहे. दररोज सरासरी 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढती संख्या देशात समूह संसर्गाची सुरुवात झाल्याचे सांगते. तसे झाल्यास परिस्थिती आणखी चिंताजनक होईल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
देशातील शहरांमध्ये मर्यादित असणारा कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही वेगाने पसरत आहे. सरासरी 30 हजारांहून अधिक रुग्ण दररोज आढळत असल्याने ही परिस्थिती देशासाठी चिंताजनक आहे. हे समूह संसर्गाचेच हे संकेत आहेत. भारतात लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाल्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्याचे ‘आयएमए’ हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.के मोंगा यांनी म्हटले आहे.
देशात आतापर्यंत 10 लाख 77 हजार 618 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 6 लाख 77 हजार 423 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 3 लाख 73 हजार 379 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 26 हजार 816 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.