ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये, लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस! १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल आमच्या देशवासीयांचे अभिनंदन. आमच्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत, असे म्हटले आहे.
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात १५० कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार झाला आहे. जगातील बहुतांश मोठ्या देशांसाठी हे मोठे आश्चर्य ठरले आहे. मात्र ही भारताची नवी इच्छाशक्ती व तिचेच प्रतीक आहे. कोलकत्यातील चित्तरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या (सीएनसीआय) विस्तारित रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात मोदी म्हणाले की लसीकरणाचा हा तो ऐतिहासिक टप्पा भारताने पार केला तो १३० कोटी लोकांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.