तालिबानचे पत्राद्वारे आवाहन – पाक वगळता सर्व देशांनी हवाईवाहतूक रोखली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जानंतर जगभरातील देशांनी तेथे जाणारी स्वतःची विमानोड्डाणे रोखली होती. पण आता राजवट स्थापन केल्यावर तालिबाने आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे पुन्हा सुरू करण्यात यावीत असे आवाहन भारताला केले आहे. अफगाण सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला (डीजीसीए) अफगाण नॅशनल कॅरियर्सला दोन्ही देशांदरम्यान विमानोड्डाणे सुरू करण्याची अनुमती देण्याचे आवाहन केले आहे.
डीजीसीएला लिहिलेल्या पत्रावर अफगाणिस्तानचे कार्यकारी विमानोड्डाणमंत्री अल्हाज हमीदुल्ला अखुंदजादाची स्वाक्षरी आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी देश सोडताना काबूल विमानतळावर नुकसान घडवून आणले होते. कतारच्या तांत्रिक सहाय्यामुळे विमानतळ पुन्हा कार्यरत झाले आहे आणि यासंबंधी 6 सप्टेंबर रोजी एनओटीएएम जारी करण्यात आल्याचे डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांना लिहिलेल्या पत्रात तालिबानने नमूद केले आहे.
या पत्राचा उद्देश दोन्ही देशांदरम्यान प्रवाशांची ये-जा सुखरुप व्हावी हाच आहे. आमच्या नॅशनल कॅरियरने (आरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअर) स्वतःच्या निर्धारित फ्लाइटस चालविण्याचे लक्ष्य बाळगले आहे. याचमुळे अफगाणिस्तान सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीला भारताने विमानोड्डाणांच्या संचालनात मदत करावी असे अखुंदजादाने पत्राद्वारे म्हटले आहे.