वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघात उत्तरप्रदेशात महिलांवर झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने भारताने नाराजी व्यक्त केली आहे. भारतातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या निवासी समन्वयक रेनेटा डेसेलियान यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. भारतातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या पदाधिकाऱयाने महिलांसोबत झालेल्या हिंसाचाराच्या काही घटनांवर अनावश्यक टिप्पणी केल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सुनावले आहे.
सरकारने या प्रकरणांना गांभीर्याने घेतल्याचे संबंधित पदाधिकाऱयाला ज्ञात असायला हवे. सध्या या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने त्रयस्थ संस्थेने अशा प्रकरणांवर टिप्पणी करणे टाळावे असे श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.
भारताची राज्यघटना सर्व नागरिकांना समानतेचा हक्क देते. एक लोकशाहीच्या स्वरुपात आम्ही वेळोवेळी समाजाच्या सर्व वर्गाच्या लोकांना न्याय देऊन हे सिद्ध केल्याचे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.