ललित उपाध्याय, हरमनप्रीत सिंगने नोंदवले भारताचे गोल
वृत्तसंस्था/ ढाका
विद्यमान विजेते आणि ऑलिम्पिक कांस्यविजेत्या भारताला झुंजार खेळ करणाऱया कोरियाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात 2-2 असे गोलबरोबरीत रोखले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्यानंतर पहिल्याच स्पर्धेत खेळणाऱया भारताने चांगली सुरुवात करताना चौथ्याच मिनिटाला पहिले यश मिळविले. ललित उपाध्यायने हा गोल नोंदवला. त्यानंतर 18 व्या मिनिटाला उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून भारताची आघाडी वाढविली. दोन गोल्सनी पिछाडीवर पडलेल्या कोरियाने मध्यंतरानंतर झुंजार खेळ केला आणि 41 व्या मिनिटाला जाँगहय़ुन जँगने आणि 46 व्या मिनिटाला सुंगहय़ुन किमने दुसरा गोल नोंदवून भारताशी 2-2 अशी बरोबरी केली.
बरोबरी साधल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या कोरियाने नंतर आपले आक्रमण आणखी तेज केले आणि भारतीय बचावफळीवर दडपण आणले. पण त्यांना गोल नोंदवण्यात यश आले नाही. शिवाय भारतानेही अधूनमधून त्यांच्या हद्दीत आक्रमण करून काही संधीही मिळविल्या. पण मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर्सचा त्यांना लाभ उठविता आला नाही. कोरियाचा गोलरक्षक जीहय़ेऑन किमने अनेकदा अप्रतिम बचाव करून भारताला यश मिळू दिले नाही. त्याच्या या कामगिरीमुळे कोरियाला एक गुण मिळविता आला. या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत या दोन संघांत झालेली शेवटची लढत 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. भारताची पुढील लढत बुधवारी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
भारताला या सामन्यात आघाडी मिळविण्यास फार वेळ लागला नाही. कोरियन सर्कलच्या बाहेर चेंडूवर ताबा घेतल्यानंतर ललितने जोरात आगेकूच केली आणि कोरियाच्या तीन डिफेंडर्सना हुलकावणी देत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. प्रारंभापासूनच भारताने आक्रमक हॉकीचा नैसर्गिक खेळ केला तर कोरियन संघ मागे राहून बचाव करण्यावर भर देत प्रतिहल्ला करण्याची संधी मिळण्याची प्रतीक्षा करीत होता. पहिल्या दोन सत्रात खेळावर भारताचेच वर्चस्व राहिले आणि लागोपाठ पेनल्टी कॉर्नर्सही मिळविले. वरुण कुमारने पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर अचूक फटका मारला होता. पण कोरियन गोलरक्षकाने तो अडविला तर दुसऱया पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने अचूक वेध घेत 18 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल नोंदवला.
दोन गोल्सनी पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱया सत्रातील शेवटच्या काही मिनिटांत कोरियाने जोर वाढवित भारतीय हद्दीत चढाया केल्या. पण भारताने उत्तम बचाव करीत त्यांना संधी मिळू दिली नाही. मात्र मध्यंतरानंतर चित्र एकदम पालटल्याचे दिसून आले. कोरियाने निश्चयी खेळ करीत आक्रमणाचा जोर वाढवला आणि 41 व्या मिनिटाला पाठोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. यातील तिसऱयावर जँगने अचूक गोल नोंदवत भारताची आघाडी कमी केली. काही मिनिटानंतर भारताच्या गुरसाहिबजित सिंगने सर्कलवरून मारलेला फटका वाईड गेल्याने भारताची ही संधी वाया गेली.
बरोबरी साधण्यासाठी कोरियाने भारतीय बचाव फळीवर पुन्हा दडपण आणले आणि त्यात त्यांना यशही आले. 46 व्या मिनिटाला डाव्या बगलेतून मिळालेल्या पासवर गोलपोस्टच्या जवळच असणाऱया सुंगहय़ुन किमने हलकेच टॅप करीत चेंडू गोलपोस्टमध्ये मारून बरोबरी साधून दिली. भारताने विजयी गोलसाठी धडपड सुरू केली आणि आणखी तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्यापैकी एकावरही त्यांना गोल नोंदवता आला नाही.