ऑनलाइन टीम / पुणे
भारत देश हा आता सरासरी वयोमानानुसार सर्वात तरूण देश असून आपल्या देशाला तरूणाईचे वरदान मिळाले आहे. भारतातील वयोमानाच्या सरासरीचे प्रमाण 28, चीन 37, अमेरिका 38, युरोप 44, तर जपान मधे 50 आहे. आधुनिक व प्रगत देशांमधिल विकास हा तरूणांची संख्या जास्त असतांना झालेला आहे. पुढील 15 वर्षे ही भारतासाठी व जगाला मनुष्यबळ पुरविण्यासाठी सुवर्ण संधी देणारी आहेत. मात्र या साठी तरूणाईला प्रशिक्षण व कौशल्य विकास या वर सर्वाधिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या संधीचा उपयोग न करता आल्यास लोकसंख्येत नुसतीच भर पडून काम करणारे हात कमी असतील, असे मत राज्यसभा पार्लमेंटचे सदस्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेद्र जाधव यांनी व्यक्त केले.
ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे व प्रॅक्टीकल एज्युस्कील आयोजित प्रॅक्टीकल बी कॉम शैक्षणिक वर्ष 2019-20 या 14 व्या बॅचमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभाच्या वेळी बोलत होते.
डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, ध्येय हे नेहमी मोठे असले पाहिजे. ते पुर्ण करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक असते. जे जे उत्तम व उन्नत असेल ते शिक्षण घ्या. मातृभूमी आणि आईवडील यांना पर्याय नाही. त्यांचा आदर करा. आपल्या अपुऱया राहिलेल्या इच्छा पालकांनी आपल्या मुलांवर लादू नयेत. यशाची मानसिकता असल्यास मोठे यश मिळते. असंही ते यावेळी म्हणाले.