वायू प्रदूषण ठरणार कारणीभूत ः जागतिक संस्थेच्या अहवालाचा निष्कर्ष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगभरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायू प्रदूषणामुळे लोकांचे आयुर्मान घटत चालले आहे. एका अमेरिकन संशोधन गटाच्या नव्या अहवालात वायू प्रदूषणामुळे 40 टक्के भारतीयांचे आयुर्मान 9 वर्षांपर्यंत कमी होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टीटय़ूटकडून (ईपीआयसी) तयार अहवालात मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणारे सुमारे 48 कोटी लोक वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीला तोंड देत असल्याचे म्हटले गेले आहे.
काळासोबत भौगोलिक स्वरुपातही वायू प्रदूषणाची उच्च पातळी वाढत आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वायू गुणवत्ता अत्यंत वेगाने खालावली असल्याचे अहवालात नमूद आहे.
धोकादायक प्रदूषण स्तरांवर आळा घालण्यासाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचे (एनसीएपी) कौतुक संस्थेने केले आहे. एनसीएपीकडून लक्ष्यप्राप्ती झाल्यास देशाचे समग्र आयुर्मान 1.7 वर्षे आणि नवी दिल्लीचे आयुर्मान 3.1 वर्षांनी वाढणार आहे.
एनसीएपीचा उद्देश औद्योगिक उत्सर्जन आणि व्हीकल एक्जास्टमध्ये कपात सुनिश्चित करून परिवहन इंधन आणि बायोमास जाळण्यासाठी कठोर नियम सादर करणे आणि धूळ प्रदूषण कमी करत 2024 पर्यंत 102 सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी 20-30 टक्क्यांपर्यंत कमी करणे आहे.