लान्सेट नियतकालिकाचा संशोधनातून निष्कर्ष, मात्र, लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे तसेच जीवनशैली सुधारणे यांची आवश्यकता
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय नागरीकांच्या सरासरी आयुष्यात 1990 पासून आजवर 10 वर्षांची घसघशीत भर पडली आहे, असे लान्सेट नामक अमेरिकेतील नियतकालिकाच्या अभ्यासात आढळून आले आहे. 1990 मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्यमान 59.6 वर्षे होते. ते 2019 मध्ये 70.8 वर्षांवर पोहचले आहे, असे या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालात सांगण्यात आले आहे.
या आयुर्मान वाढीत केरळ राज्य आघाडीवर असून या राज्यातील नागरीकांचे सरासरी आयुर्मान 77.3 वर्षे आहे. तर उत्तर प्रदेश या सर्वात मोठय़ा राज्यातील आयुर्मानातही मोठी वाढ झाली असून ते आता सरासरी 66.9 वर्षे झाले आहे. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, ईशान्य भारत, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडीशा आदी राज्यांमध्ये 68 ते 74 वर्षे इतके असून बिहार व पश्चिम बंगाल येथे ते 67 ते 69 वर्षे इतके आहे.
मात्र निरोगीपणाची कमतरता
भारतीयांच्या सरासरी आयुष्यात मोठी वाढ झाली असली तरी निरोगी आयुष्यमानात मात्र इतकी वाढ झालेली नाही, ही असमाधानकारक बाब असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. भारतीय लोक पुष्कळ जगतात पण त्यांना वाढत्या वयात आजारीपण आणि अपंगत्व या संकटांना मोठय़ा प्रमाणात तोंड द्यावे लागते, असेही निरीक्षण या नियतकालिकाने नोंदविले आहे.
लोकसंख्यावाढीचा अडथळा
भारताची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवा आणि राहणीमान यांच्यावर विपरीत परिणाम होतो. आयुर्मान वाढण्याशी या बाबींचा नजीकचा आणि घनिष्ट संबंध असल्याने लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे. लोकसंख्या नियंत्रण झाल्यास सकस आहार आणि औषधयोजना करणे सोपे होईल, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
सुधारणा कशात ?
साथीचे रोग, बाळंतरोग, बाळंतपणातील मृत्यू, बालमृत्यू, कुपोषणामुळे मृत्यू आदींचे प्रमाण गेल्या 30 वर्षांमध्ये लक्षणीयरित्या कमी झाले. परिणामी भारतीयांचे आयुर्मान वाढले. तथापि, उच्च रक्तदाब, मधुमेह, संधीवात, लठ्ठपणा, हृदयविकार इत्यादी व्याधींचे प्रमाण वाढले आहे. या व्याधी बदलली जीवनशैली, फास्टफूड खाण्याचे वाढते प्रमाण, एकंदरीतच आहाराच्या प्रमाणात वाढ, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणावात वाढ यामुळे निर्माण होतात. त्यामुळे भारतीयांनी या विकारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. प्रकृतीची हेळसांड अंतिमतः आयुर्मान कमी होण्यास कारणीभूत असते, असे या अभ्यास अहवालात प्रामुख्याने सांगण्यात आले असून लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. अन्न पुरवठा असमतोलही याला उत्तरदायी आहे.
अन्न असमतोल
भारतीय समाज विविध आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये विभागाला आहे. याचा परिणाम अन्न वितरणावरही होतो. गरीब आणि सामाजिकदृष्टय़ा वंचित समाजातील लोकांमध्ये सकस आहाराचा तुटवडा असतो. हा असमतोल दूर करण्याचा प्रयत्न केल्यास आयुर्मान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन व जनता यांनी या मुद्दय़ांकडे लक्ष देण्याची आवश्यकता अहवालात प्रतिपादन करण्यात आली आहे.
कोरोनाची भूमिका
सध्या कोरोना विषाणूचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला. भारतात कोरोना मृत्यूचा दर बराच कमी असला तरी चिंतेचे कारण संपलेले नाही. त्यामुळे या स्थितीकडे जनता आणि सरकार या दोघांनीही लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असेही अहवालात सुचविण्यात आले आहे.
विकार टाळता येणे शक्य
भारतीयांनी मानसिक तणाव व्यवस्थापन चांगल्या रितीने केल्यास आणि बैठेपणा टाळल्यास, तसेच नियमित पुरेसा व्यायाम घेतल्यास ‘जीवनशैली विकार’ मोठय़ा प्रमाणात टाळता येणे शक्य आहे. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवल्यास अनेक विकारांपासून मुक्त राहता येणेही अशक्य नाही, अशी सूचना करण्यात आली आहे.