प्रतिनिधी / मडगाव
विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना (ओसीआय) कार्डधारकांना भारतात येण्याची परवानगी देण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयाचे अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सातत्याने खलाशी, ओसीआयधारक व अनिवासी भारतीयांच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचे श्री. सावईकर यांनी म्हटले आहे.
विदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा भारतात परत येण्यास केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ‘कोविड-19’ जगभरात पसरलेला आहे. या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधानांनी दिवशात अडकलेल्या भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे श्री. सावईकर यांनी म्हटले आहे.
ओव्हरसीज सिटीझन्स ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांच्या काही प्रवर्गांना पुन्हा भारतात येण्याची परवानगी शुक्रवारी दिली. यामध्ये परदेशातील भारतीय नागरिकांमध्ये जन्मलेल्या अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ज्यांचे ओसीआय कार्ड आहे, ज्यांना कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ओसीआय कार्डधारक आहेत व ज्यांचे पालक भारतात राहणारे भारतीय नागरिक आहेत, त्यांना प्रवास करण्यास मान्यता दिली आहे.
वंदे भारत मिशनच्या दुसऱया टप्प्यात 47 देशांनी अडकलेल्या 32 हजार भारतीयांना 160 विमानांनी पुन्हा भारतात आणले जात आहे.