वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरात कोरोना महामारीचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. दरम्यानच्या काळामध्ये भारतीय कुटुंबांनी जवळपास 14 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त बचत करण्यात यश मिळविले आहे. यूबीएस या फर्मच्या एका संशोधनामधून ही माहिती समोर आली आहे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांच्या जीवनावर आणि व्यवसायावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला होता. यातून बचतीची चांगली सवय मात्र भारतीयांना जडली. लोकांनी बचतीवर भर दिला आणि खर्चावर मात्र बऱयापैकी नियंत्रण मिळविलं. यातूनच भारतीयांनी बचतीच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांची अतिरिक्त बचत केली. 2014 ते 2019 च्या कालावधीदरम्यान बचतीत सातत्याने घट दिसली आहे. लॉकडाऊनच्या काळात मंदीमुळे लोकांना खर्च कमी करता आला. मुळात बाहेर भटकण्यासच भीतीमुळे बंदी लादली गेल्याने अनेकांनी सुरक्षेसाठी घरीच राहणे पसंत केले होते. वाढती महागाई, रोजगारात घट व नोकरी-व्यवसायातील असुरक्षिततेमुळेच अनेकांनी बचतीवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यामुळे आपोआपच लोकांच्या खर्चावर मर्यादा आली.