नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू होण्यापूर्वी म्हणजे 2019 मध्ये ब्रिटनला मागे टाकत भारताने जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंत धडक मारली होती. तथापि, 2020 च्या प्रारंभी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर भारतासह सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. मात्र, आता लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर अर्थव्यवस्था सावरू लागल्या असून येत्या दहा वर्षात भारताची अर्थव्यवस्था तिसऱया स्थानापर्यंत झेप घेईल, असा दावा करण्यात आला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ही 2025 पर्यंत जगातील पाचवी तर 2030 मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असे भाकीत ‘सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ (सीईबीआर) या संस्थेने वर्तवले आहे. ‘सीईबीआर’ संस्थेच्या एका अहवालात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. कोरोनाच्या विळख्यानंतर 2020 मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. कोरोना महामारी आणि रुपयाची डळमळीत स्थिती ही दोन मुख्य कारणे यामागे असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आता भारत पूर्वस्थितीच्या दिशेने मार्गक्रमण करत असून भारत 2025 मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून जाईल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये 9 टक्के आणि 2022 मध्ये 7 टक्क्मयांनी वाढेल असेही ‘सीईबीआर’ने म्हटले आहे. आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताच्या विकासदरात वाढ होत भारत 2030 मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच भारत 2025 मध्ये ब्रिटन, 2027 मध्ये जर्मनी आणि 2030 मध्ये जपानला मागे टाकेल, असेही या अहवालात म्हटले आहे.
चीन करणार अमेरिकेवर कुरघोडी
पुढील सात-आठ वर्षात चीन अमेरिकेवर कुरघोडी करेल असा दावाही ‘सीईबीआर’च्या अहवालात करण्यात आला आहे. चीन 2028 पर्यंत अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. सुरुवातीला चीन 2033 पर्यंत या स्थानावर पोहोचेल, असे सांगितले जात होते. मात्र, कोविड-19 महामारीने परिस्थिती बदलून टाकल्यामुळे अनेक देशांचे निकष बदलले आहेत. चीन वेगाने या संकटातून बाहेर पडला आहे. तर अमेरिकेचा अजूनही संघर्ष सुरुच आहे. याच कारणामुळे चीन पाच वर्षांमध्येच अमेरिकेपेक्षा पुढे पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
आरबीआयकडूनही शुभसंकेत
कोरोना विषाणूच्या प्रकोपानंतर भारतीय अर्थव्यवस्था बहुतांश अनुमानाच्या तुलनेत वेगाने सावरत असल्याचा दावा अलिकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केला होता. भारतीय अर्थव्यवस्था कोविड-19 च्या माऱयातून वेगाने उभारी घेत असल्याचे अनेक संकेत आताच मिळू लागले आहेत. कोरोनाचे संक्रमण सप्टेंबर महिन्यापासून सातत्याने कमी होत आहे. तर संक्रमण घटल्याने गुंतवणूक आणि मागणीला चालना मिळाली आहे.
आर्थिक घडामोडी वेगवान
वित्तीय प्रोत्साहनाच्या उपाययोजना अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्याच्या दृष्टीने पूरक ठरल्या आहेत. यात पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजवर होणाऱया खर्चासह आत्मनिर्भर 2.0 आणि 3.0 मुळे गुंतवणूक वाढली आहे. भारतात कोरोना महामारीची ‘दुसरी लाट’ न आल्याने अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्यास सहाय्य झाले आहे. देशाच्या बहुतांश भागात उद्योगधंद्यांनीही गती घेतली असून औद्योगिक विकासदर सुधारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तथापि, इंधन दरवाढीसह काही जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे अद्याप महागाईवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आलेले नाही.