डॉ. सोनाली सरनोबत यांचे प्रतिपादन : शारदोत्सव महिला सोसायटीच्या आनंदमेळा-खाद्यमेळाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय उत्सव व आहार याचे जतन आपण केले तर आपली संस्कृती वृध्दींगत होऊन अबाधित राहील. याची महत्त्वाची जबाबदारी स्त्राr शक्तीकडेच आहे. त्यांनी भारतीय आहाराला समृद्ध केले असून त्यांच्या पाक कौशल्याला शारदोत्सवाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले ही स्वागतार्ह बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले.
शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित रामनाथ मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या आनंदमेळा-खाद्यमेळाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका ज्योस्ना पै उपस्थित होत्या.
महिलांच्या विविध कौशल्याला वाव मिळणे आवश्यक
महिलांच्या विविध कौशल्याला वाव मिळणे आवश्यक असून अनेक सरकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे डॉ. सोनाली यांनी सांगितले. तसेच लवकरच महिलांसाठी प्रशिक्षण संस्था सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. ज्योस्ना पै यांनी अशा उत्सवातून प्रदर्शनातून महिलांना अनुभव येतो. आव्हानांची कल्पना येते, शिवाय आत्मविश्वास दुणावतो असे सांगून ग्राहकांना काय हवे? त्याचे सर्व्हेक्षण करून उद्योग सुरू करा, असा सल्ला दिला.
उद्या बक्षीस वितरण
प्रारंभी मराठा महिला मंडळाने स्वागतगीत सादर केले. या मेळाच्या इव्हेंट चेअरमन बिंबा नाडकर्णी यांनी आयोजनाबद्दल माहिती दिली. संचालिका विजया धोपेश्वरकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. अध्यक्षा अरुणा नाईक यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सुनिता पाटणकर यांनी केले. राही कुलकर्णी यांनी आभार मानले. यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी समूहगीत गायन स्पर्धा पार पडल्या. बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. सदर मेळामध्ये 55 स्टॉल असून ते 21 पर्यंत खुले राहणार आहेत.