वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची माजी आंतरराष्ट्रीय दर्जाची महिला धावपटू पी. टी. उषा हिची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल केंद्रीय कायदामंत्री व माजी क्रीडा युवजन खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी पी. टी. उषा यांचे खास अभिनंदन केले आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी गोल्डन गर्ल पी. टी. उषाची निवड झाल्याने देशातील ऍथलेटिक्स क्षेत्राला त्याचा अधिक लाभ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशातील विविध राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक माजी ऍथलिट्सनी पी. टी. उषाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. पी. टी. उषाने आपल्या वैयक्तिक ऍथलेटिक्स कारकीर्दीत आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये चार सुवर्णपदके आणि सात रौप्यपदके मिळविली होती. 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर हर्डल्समध्ये पी. टी. उषाचे पदक थोडक्मयात हुकले होते. या क्रीडा प्रकारात तिने 55.42 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.