वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संपूर्ण देशामध्ये कारगिल विजयोत्सव दिवस मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात आला. 21 व्या कारगिल विजयोत्सवानिमित्त भारतीय खेळाडूंनी भारतीय सेनेला सॅल्युट केला आहे.
1999 साली तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत भारतीय सेनेने पाक सेनेचा पराभव करून कारगिलवर तिरंगा फडकविला होता. भारतीय सेनेच्या कारगिल युद्धाला ‘ऑपरेशन विजय’ असे संबोधण्यात आले.
कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांच्या बहाद्दूरीचे स्मरण तसेच काही जवानांच्या निःस्वार्थ बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीय नागरिकाला आजही असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. भारतीय जवानांचे आम्ही शेवटपर्यंत ऋणी राहू असे सचिनने म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली तसेच माजी कसोटीवीर व्हीव्हीएस लक्ष्मण तसेच वीरेंद्र सेहवाग यांनीही कारगिल युद्धातील शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहली.