वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लंकेच्या दौऱयावर जाणाऱया शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय क्रिकेट संघ मुंबईत 14 दिवस क्वारंटाईन असणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली. क्वारंटाईनचा कालावधी 14 ते 28 जून दरम्यान राहणार आहे. त्यानंतर संघ लंका दौऱयावर रवाना होईल.
लंकेच्या दौऱयात भारतीय क्रिकेट संघ 3 वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱयाला 13 जुलैपासून प्रारंभ होईल. यानिमित्ताने भारताचे दोन संघ 2 विभिन्न दौऱयावर असतील. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंडमध्ये असून आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील त्यांचा अंतिम सामना न्यूझीलंडबरोबर होणार आहे. या सामन्यानंतर भारताच्या इंग्लंड दौऱयाला प्रत्यक्षात प्रारंभ होईल. उभय संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका आयोजित केली आहे.
शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला कोलंबोला प्रयाण करण्यापूर्वी क्वारंटाईनच्या कालावधीत एक दिवस आड असे एकूण सहावेळा कोरोना चाचणी द्यावी लागणार आहे. भारतीय संघ चार्टर फ्लाईटने कोलंबोला प्रयाण करणार आहे. दरम्यान कोरोना संदर्भातील हवाई प्रवासाकरिता नियमामध्ये कोणताही बदल राहणार नाही.
क्वारंटाईनच्या कालावधीत भारतीय संघातील खेळाडू 7 दिवस आपल्या रुममध्ये राहतील. जैविक सुरक्षेच्या नियमानुसार संघातील खेळाडूंना एका विशिष्ट ठिकाणी भेटण्याची मुभा राहिल. त्याचप्रमाणे या क्रिकेटपटूंना जीमची सुविधाही या कालावधीत उपलब्ध राहिल. कोलंबोमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना निवासाची सोय केलेल्या हॉटेलमध्ये तीन दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. कोलंबोतील ताज समुद्रा या पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेटपटूंची निवासाची सोय लंकन क्रिकेट मंडळाने केली आहे.