भारतातील कोरोनाच्या महाप्रकोपामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या स्टार धावपटू हिमा दास व दुती चंद यांना पोलंडमध्ये होणारी ऑलिम्पिक पात्रता वर्ल्ड ऍथलेटिक्स रिले स्पर्धा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1 व 2 मे रोजी ही स्पर्धा होणार आहे. कोरोनाच्या महाउद्रेकामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे भारतीय ऍथलेट्सचे ऍमस्टरडॅमला जाणारे विमान रद्द करण्यात आल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
महिलांचा 4ƒ100 मी. व पुरुषांचा 4ƒ400 मी. संघ केएलएमच्या विमानाने गुरुवारी पहाटे ऍमस्टरडॅमला (नेदरलँड्स) जाणार होते. पण भारतातून येणाऱया प्रवेशावर हॉलंड सरकारने सोमवारी रात्रीपासून बंदी घातल्यामुळे ते विमान रद्द करावे लागले. भारतातून पोलंडकडे जाण्यासाठी थेट विमान उपलब्ध नाही. त्यामुळे पोलंडमधील सिलेसिया येथे जाण्यासाठी युरोपकडे जाणाऱया पर्यायी विमानाची सोय करण्याचा प्रयत्न सध्या ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) चालविला आहे. ‘आपले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, याबद्दल साशंकताच वाटत आहे. युरोपमधील अनेक देशांनी भारतीय प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आपले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील, असे वाटत नाही,’ असे एएफआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. तरीही आम्ही प्रयत्न सुरू ठेवले आहेत, असेही ते म्हणाले.
महिलांच्या रिले संघात एस.धनलक्ष्मी, अर्चना सुसीन्द्रन, हिमाश्री रॉय, एटी दानेश्वरी यांचा समावेश आहे. सिलेसियातीलच चोर्झोव येथे होणाऱया स्पर्धेत पुरुष संघ भाग घेणार आहे. वर्ल्ड ऍथलेटिक्स रिले स्पर्धेतील पहिले आठ संघ टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. महिलांच्या 4ƒ400 मी. रिलेमधून भारताने माघार घेतली असून यातील दोनहून अधिक महिला अनफिट असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. भारताच्या मिश्र 4ƒ400 मी. रिले संघाने मात्र याआधीच पात्रता मिळविली आहे. 2019 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठत त्यांनी ही पात्रता मिळविली होती.