कोझीकोड :
द्वेष, हिंसा, संघर्ष आणि दहशतवादापासून मुक्तीचा मार्ग चोखाळू पाहणाऱया जगासाठी भारतीय जीवनपद्धत आशेचा किरण ठरली आहे. संघर्षाला क्रूर शक्तीऐवजी संवादाच्या शक्तीने दूर करणे हीच भारतीय जीवनपद्धत आहे. शतकानुशतके भारतीय भूमीने जगाचे स्वागत केले आहे. जगभरात कित्येक संस्कृती नामशेष झाल्या असताना भारतीय संस्कृती मात्र बहरतच गेल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयएम कोझीकोडमध्ये ‘ग्लोबलायजिंग इंडियन थॉट’ विषयावर बोलताना काढले आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांनी आयआयएम परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळय़ाचे अनावरण केले आहे.
भारतीय विचार गतिमान आणि वैविध्यपूर्ण आहे. काही आदर्श भारतीय मूल्यांचे केंद्रीय बिंदू निर्माण झाले आहेत. दया, सद्भाव, न्याय, सेवा आणि स्वच्छंदीपणा ही ती मूल्ये आहेत. 20 व्या शतकात महात्मा गांधी यांनी याच आदर्शांचे पालन करत भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका पार पडली आहे. याच आदर्शांनी देशाबाहेरील कोटय़वधी लोकांना बळ दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वामी विवेकानंदांची भूमिका
भारतीय विचार जागतिक स्तरावर पोहोचविण्यात स्वामी विवेकानंदांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. आयएमएमच्या पसिरात स्वामी विवेकानंदांच्या पुतळय़ाला विशेष स्थान मिळाले असताना येथेच भारतीय विचाराच्या जागतिकीकरणावर चर्चा करणे केवळ योगायोग नसल्याचे विधान मोदींनी केले आहे.