आज जागतिक टपाल दिन : तंत्रज्ञानाच्या युगात आजही पोस्ट विभाग तग धरून
सुशांत कुरंगी /बेळगाव
पूर्वीच्या काळी आलेली तार, मनीऑर्डर, राख्या व पत्र पोहचविणे इतकेच काम पोस्टमन करीत होते. परंतु जसा काळ लोटला तसा टपाल खात्याच्या कार्यपद्धतीतही बदल झाला. पार्सल डिलिव्हरी, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, विमा, वेस्टर्न मनी ट्रान्सफर, पासपोर्ट, सीएससी सेंटर अशा सेवांच्या माध्यमातून टपाल खाते डिजिटल होत आहे. सायकलवरून घरोघरी टपाल वाटणारे पोस्टमन आता दुचाकीवरून मोबाईलच्या सहाय्याने 2 मिनिटांत खाते उघडून देत आहेत. ग्राहकांना हव्या असणाऱया सेवा टपालखाते घरपोच देत असल्यामुळेच तंत्रज्ञानाच्या या युगात आजही हा विभाग तग धरून आहे.
तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने मध्यंतरी टपाल खाते पिछाडीला गेले. मेसेज, व्हॉट्सऍप, मेलच्या जमान्यात टपाल खाते संपून जाईल का? अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु टपाल विभागानेही आधुनिकतेची कास धरत आपल्या पद्धतीमध्ये बदल घडविले. ग्राहकांना हव्या असलेल्या सेवा टपाल विभागाने घरपोच सुरू केल्या आहेत. खासगी कुरिअर कंपन्यांच्या तोडीस तोड नोडल डिलिव्हरी सेंटर सुरू करण्यात आले. या माध्यमातून मध्यंतरीच्या काळात दुरावलेला ग्राहक पुन्हा एकदा टपाल खात्याकडे वळला. शनिवार दि. 9 रोजी ‘जागतिक टपाल दिन’ साजरा करण्यात येत असून डिजिटल व्यवहारांवर भर देण्याचा प्रयत्न टपाल विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
विमानानेही टपालाची वाहतूक
बेळगाव टपाल विभाग हा देशातील अव्वल विभाग आहे. टपाल दुसऱया जागी तातडीने पोहचावे यासाठी विमानाने टपालाची वाहतूक केली जात आहे. बेळगाव विमानतळावरून कार्गो सेवा सुरू असून 13 शहरांना सेवा देण्यात येत आहे. यामुळे टपाल जलद गतीने पोहचविणे सोयीचे होत आहे. याचसोबत हुबळी ते मुंबई व हुबळी ते बेंगळूर या मार्गावर टपाल खात्याची वाहने देण्यात आली आहेत. दररोज ही वाहने या मार्गावर टपालाची वाहतूक करीत असतात. याचसोबत रेल्वेचाही वापर केला जात असतो. स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्टला आजही मोठी मागणी आहे.
महिन्याला 5 हजार कुरिअरची वाहतूक
खासगी कुरिअर कंपन्यांच्या तोडीस तोड पार्सल विभाग बेळगाव टपाल विभागाची कुरिअर सेवा सुरू आहे. नेडल डिलिव्हरी सेंटर (पार्सल सेंटर) साठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. तीन कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली असून महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुरिअर सेवा दिली जात आहे. यासाठी स्वतंत्र्य चारचाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून ग्राहकांना अवघ्या काही तासांमध्ये पार्सल दिले जात आहे. महिन्याला 4 ते 5 हजार कुरिअर पोहचविले जात असल्याची माहिती टपाल खात्याने दिली आहे.
आयबीपीएसमधून डिजिटल व्यवहार
इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक (आयबीपीएस) च्या माध्यमातून टपाल खात्याने बँकिंग क्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. पूर्णपणे पेपरलेस अशी या बँक खात्याची प्रणाली आहे. आधार क्रमांकाच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटांमध्ये बँकमध्ये खाते उघडता येऊ शकते. पोस्टमनकडे मोबाईल देण्यात आला असून त्याद्वारे तो खाते उघडू शकतो. आयबीपीएस ऍपद्वारे खातेधारक घरबसल्या वीजबील भरणे यासह पैसे पाठविणे शक्मय होत आहे. संपूर्ण व्यवहार डिजिटल असून त्याची माहिती खातेधारकाच्या मोबाईलवर देण्यात येते.
पासपोर्ट सेवा केंद्राची उड्डाणे
परदेशात जाण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे पासपोर्ट. आज एक ओळखीचा दाखला म्हणूनही पासपोर्टचा वापर होत असल्याने पासपोर्ट काढणाऱयांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यापूर्वी हुबळी येथे पासपोर्ट केंद्र होते. परंतु येण्याजाण्यास गैरसोयीचे होत असल्याने पोस्ट विभागाच्या सहकार्याने बेळगावमधील कॅम्प येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. कोरोनामुळे सध्या दररोज 75 लोकांच्या कागदपत्रांची तपासणी या ठिकाणी करण्यात येते. सध्या महिन्याला 1500 ते 1600 नागरिक पासपोर्ट काढून घेत आहेत.
सीएससीसह इतरही सेवा
ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये आल्यानंतर सर्व सेवा मिळाव्यात यासाठी बेळगावच्या मुख्य कार्यालयामध्ये सीएससी सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वीज बिल, मोबाईल रिचार्ज, आधार नोंदणी यासह इतर सेवा दिल्या जात आहेत. आधार अनेबल पेमेंटमुळे आधार क्रमांकाच्या सहाय्याने कोणतीही व्यक्ती 10 हजार रूपयांपर्यंतची रक्कम काढू शकते. तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पेन्शन काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बेळगाव विभागात 150 पोस्टमन मोबाईल
बेळगाव पोस्ट विभागात बेळगावसह खानापूर, सौंदत्ती, रामदुर्ग व बैलहोंगल या तालुक्मयांच्या समावेश होतो. विभागात 150 पोस्टमनना मोबाईल देण्यात आला आहे. शहरी व तालुक्मयातील महत्त्वाच्या गावी असे 69 डिपार्टमेंटल टपाल कार्यालय असून गावोगावी असणाऱया 271 ब्रॅंच ऑफिस आहेत.
ग्राहकांना जलद सेवा देण्याचा प्रयत्न
टपाल खात्यामध्ये मोठे बदल केले जात आहेत. संपूर्ण व्यवहार डिजिटल होत असून ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बँकिंग, विमा, पासपोर्ट, सीएससी, आधार अनेबल पेमेंट सेवा दिल्या जात असल्याने ग्राहकांचा ओढा वाढल्याचे एस. बी. हसबी यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
– एच. बी. हसबी (पोस्ट अधीक्षक, बेळगाव विभाग)
तार आली की, काळजात धस्स व्हायचं
ज्या काळी मोबाईल – इंटरनेटची सुविधा नव्हती, त्याकाळी संदेश पोहचविण्यासाठी तार हे एकमेव माध्यम होते. कोणी आजारी अथवा मयत झाले असेल तर त्याची माहिती तार करून कळविली जात होती. त्यामुळे तार घेवून पोस्टमनचा संदेश आला की, नागरीकांच्या काळजात धस्स होत असे. आता कोणाविषयी पोस्टमन माहिती देणार आहे? या विचाराने मन व्याकूळ होत असल्याचे जाणकार सांगतात.
टपाल खात्याकडून देण्यात येणाऱया सेवा
- पोस्टल कुरिअर सेवा
- इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक
- पोस्ट- पासपोर्ट सेवा केंद्र
- सीएससी केंद्र
- वेस्टर्न मनी ट्रान्सफर
- पोस्टल विमा