वृत्तसंस्था/ ग्वाटेमाला सिटी
भारताच्या रिकर्व्ह तिरंदाजांनी विश्व चषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करताना महिला संघाने पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविले आहे. अंकिता भगत व दीपिका कुमारी यांनी शानदार प्रदर्शन करीत हे यश मिळविले. महिला संघासह पुरुष संघानेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
अतानू दासने जागतिक अग्रमानांकित ब्रॅडी एलिसननंतर दुसरे स्थान मिळविल्याने भारतीय पुरुष संघाला तिसरे स्थान मिळाले. भारताच्या पुरुष व महिला संघांनी थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळविली आहे. मिश्र सांघिकमध्ये अतानू दास व दीपिका विवाहानंतर प्रथमच एकत्र खेळणार आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यास ऑलिम्पिकमध्ये खेळणारे पहिले दाम्पत्य होण्याचा मान आम्हाला मिळणार आहे, असे अतानू म्हणाला. या दोघांनी मिश्रमध्ये एकत्र खेळताना आशियाई चॅम्पियनशिपमध्ये शेवटचे कांस्यपदक मिळविले होते. उपांत्यपूर्व फेरीत दास-दीपिकाची लढत फ्रान्सच्या जोडीशी होणार आहे तर अग्रमानांकित भारतीय महिला संघाची लढत यजमान ग्वाटेमालाशी होणार आहे. पुरुष संघाची लढत स्पेन व ग्वाटेमाला यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
जुलै 2019 मध्ये बर्लिन येथे झालेल्या स्टेज 4 मध्ये व नोव्हेंबर 2019 मध्ये बँकॉकमधील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतल्यानंतर विश्व चषक स्पर्धेत भारतीय संघ प्रथमच खेळत आहे.