इतिहास रचणाऱया सुवर्णजेत्या नीरज चोप्रासह सर्व ऍथलिट्सचे दिल्लीत आगमन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचणाऱया भालाफेकपटू नीरज चोप्रासह सर्व भारतीय ऍथलिट्सचे सोमवारी मायदेशी आगमन झाले. भारतीय ऍथलिट्सच्या स्वागतासाठी चाहत्यांनी येथील विमानतळावर दुतर्फा गर्दी केली. शिवाय, खेळाडू बाहेर आल्यानंतर विजयाच्या घोषणाही दिल्या.
सर्व खेळाडू व पथकाचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने महासचिव संदीप प्रधान यांनी स्वागत केले. ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष ऍदिले सुमरीवाला त्यांच्या समवेत उपस्थित होते.
विमानतळ अधिकाऱयांनी सर्वप्रथम खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन व टाळय़ांच्या गजरात स्वागत केले. खेळाडू विमानतळाबाहेर आल्यानंतर त्यापूर्वीच मोठय़ा संख्येने हजर राहिलेल्या चाहत्यांची गर्दी उसळली आणि सोशल डिस्टन्सिंगचा इथे खऱया अर्थाने फज्जा उडाला.
भारताने यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 7 पदकांची सर्वोच्च कमाई केली. यापूर्वी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली होती, तो विक्रम येथे मागे टाकला गेला. यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्ण जिंकून दिले तर मिराबाई चानू व रवि कुमार दहिया रौप्यपदकाचे मानकरी ठरले. लोवलिना बोर्गोहेन, पीव्ही सिंधू, भारतीय हॉकी संघ व बजरंग पुनिया यांनी कांस्य पदके जिंकली.
पदकविजेत्यांमध्ये चानू व सिंधू हे निर्बंधामुळे लवकर मायदेशी परतले होते. आपल्या इव्हेंटचा बक्षीस वितरण सोहळा झाल्यानंतर 48 तासांच्या आत टोकियोतून रवाना होण्याचे पदकजेत्यांवरही निर्बंध होते. भारताने यंदा टोकियो ऑलिम्पिकसाठी 120 ऍथलिट्ससह 228 सदस्यांचे बडे पथक पाठवले होते. यंदाची ऑलिम्पिक कोरोनामुळे वर्षभर उशिराने आयोजित केली गेली.
दडपण हाताळण्याबाबत रणनीती बदलावी लागेल ः दीपिका कुमारी
कोलकाता ः ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठावर दडपण हाताळण्याबाबत मला माझी रणनीती बदलावी लागेल, असे भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी म्हणाली.
27 वर्षीय दीपिका यंदा वर्षभरात उत्तम बहरात होती. तिने या कालावधीत 5 वर्ल्डकप पदके जिंकली. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिरंदाजीतील पहिलेवहिले पदक जिंकून देण्यात ती यशस्वी होऊ शकली नाही. वैयक्तिक व मिश्र अशा दोन्ही गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर तिचे टोकियोतील आव्हान संपुष्टात आले.
‘वो पांच रिंग का प्रेशर हावी हो जाता है’, असे दीपिकाने येथे कबूल केले. ‘आपण पदक जिंकलेले नाही, आपल्या खात्यात पदक नाही, अशी चर्चा नेहमी झडत राहते आणि त्याचा खेळावर परिणाम होतो. एक प्रकारचे मानसिक दडपण येत राहते आणि यामुळे तंत्रही बिघडते. माझ्या मते, विश्वचषक असेल, वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा ऑलिम्पिक, आपण सर्व सामन्यांकडे एकाच दृष्टीने पहायला हवे. मात्र, आपण फक्त पदकांपुरताच विचार करतो, त्याचा खेळावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वाढते’, असे ती पुढे म्हणाली.
यजमान देश या नात्याने आम्ही ऑलिम्पिक संपन्न करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे, असा विश्वास वाटतो. ऑलिम्पिकच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेणाऱया सर्व घटकांचे, स्थानिक नागरिकांचे आम्ही आभारी आहोत.
– जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा