वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा व प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री इंग्लंडला जाणाऱया संघाच्या बायोबबलमध्ये मंगळवारी सामील झाले. पुरुष व महिला संघांच्या आठ दिवसांच्या हार्ड क्वारंटाईनला येथे सुरुवात झाली आहे.
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक असणाऱया ग्रँड हयातमध्ये भारतीय महिला संघाच्या हार्ड क्वारंटाईनला सुरुवात करण्यात आली आहे. या दरम्यान दोन्ही संघांतील सर्व खेळाडू, साहायक स्टाफमधील सदस्यांची तीनवेळा आरटी-पीसीआर चाचणी होणार असून निगेटिव्ह अहवाल असणाऱयांनाच इंग्लंडला पाठविले जाणार आहे. दोन्ही संघ जूनला इंग्लंडकडे प्रयाण करणार आहेत.
इंग्लंड दौऱयात भारतीय पुरुष संघ सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अंतिम लढतीत भाग घेणार आहे. ही लढत 18 जूनपासून सुरू होईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पूर्ण लांबीची मालिका होणार आहे तर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन वनडे व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याची सुरुवात 16 जूनपासून होणार आहे.
‘कोव्हिड 19 बाधेतून पूर्ण बरे झालेले वृद्धिमान साहा व प्रसिद्ध कृष्णा दोघेही दोन दिवसांपूर्वीच बायोबबलमध्ये दाखल झाले तर मुंबईचे निवासी असलेले रोहित शर्मा, विराट कोहली व रवी शास्त्री हे आज बायोबबलमध्ये सामील झाले आहेत,’ असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले. खेळाडूंच्या फॅमिलीला दौऱयावर घेऊन जाण्याबाबत अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. पण ती लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. ‘आपल्या खेळाडूंना तीन महिने फॅमिलीपासून दूर ठेवणे आणि तेही बबलमध्ये, योग्य ठरणार नाही. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ते योग्यही नाही,’ असे या सूत्राने सांगितले.
भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना तेथेही हार्ड क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. पण हा कालावधी कमी केला जावा यासाठी ईसीबीशी बोलणी सुरू आहेत. हार्ड क्वारंटाईनचा (हॉटेल रूममध्येच राहणे) कालावधी कमी केला जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. पाच कसोटींच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, असे ईसीबीने बीसीसीआयकडे स्पष्ट केले असल्याचे वृत्त याआधीच देण्यात आले आहे.