वृत्त संस्था/ माले
सॅफ चषक पुरूषांच्या फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत राखण्यासाठी भारतीय पुरूष फुटबॉल संघाला बुधवारी येथे होणाऱया सामन्यात मालदीव संघावर विजय मिळविण्याची नितांत गरज आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघ अपराजित राहिला आहे.
2003 नंतर या स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाची यावेळी ही सर्वात खराब कामगिरी झाली आहे. बुधवारी भारत आणि मालदीव यांच्यात राऊंड रॉबिन लीग गटातील शेवटचा सामना होणार आहे. हा सामना गमविल्यास किंवा बरोबरीत राखल्यास भारताचे अंतिम फेरीत पोहचण्याचे आव्हान समाप्त होईल त्यामुळे भारतीय संघाला यजमान मालदीववर विजय मिळविण्याशिवाय पर्याय नाही. भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत ही स्पर्धा सातवेळा जिंकली आहे.
2003 साली या स्पर्धेत भारताला तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले होते. तसेच अन्य 11 वेळा झालेल्या या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने विजेतेपद किंवा उपविजेतेपद मिळविले आहे. पाच संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ सध्या तिसऱया स्थानावर आहे.
मालदीव संघाने तीन सामन्यांतून सहा गुण घेत आघाडी घेतली आहे तसेच नेपाळने तीन सामन्यांतून सहा गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. सरस गोल सरासरीच्या आधारे मालदीवने नेपाळला मागे टाकले आहे. बांगलादेशचा संघ 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. मालदीवचा संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. या संघाचे नेतृत्व अली अश्फाककडे सोपविण्यात आले. कर्णधार सुनील छेत्रीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील.