वृत्तसंस्था/ मुंबई
सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळत आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या दिवस-रात्रीच्या सामन्यात भारतीय फलंदाजीची झालेली दैना पाहून आता भारतीय फलंदाजांना मार्गदर्शन करण्याकरिता माजी कर्णधार राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला तातडीने पाठवावे, असे वैयक्तिक मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसकर यांनी व्यक्त केले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या निकृष्ट कामगिरीचे प्रदर्शन ऍडलेडच्या मैदानावर घडल्याने आता कोहली आणि त्याच्या साथीदारावर टीकेची झोड उठत आहे. या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव केवळ 36 धावांत आटोपला. कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. भारतीय संघातील फलंदाजांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी माजी कर्णधार राहुल द्रविडला तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवावे, अशी सूचना दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याकडे केली आहे. राहुल द्रविड सध्या बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. अशा नाजूक स्थितीमध्ये भारतीय फलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी द्रविड ही एकमेव व्यक्ती योग्य असल्याचे वेंगसरकर यांनी म्हटले आहे.
कर्णधार विराट कोहली आता या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यासाठी उपलब्ध होवू शकणार नाही. सिडनीतील तिसऱया कसोटीपूर्वी भारतीय संघाला मार्गदर्शन द्रविडकडून मिळू शकेल. कारण कोरोना महामारी समस्येमुळे क्वारंटाईन दोन आठवडय़ासाठी सक्तीची असल्याने द्रविडकडून भारतीय फलंदाजांना महत्त्वाच्या टीप्स मिळू शकतील. सिडनीची तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 2003 साली ऍडलेडच्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडय़ांनी पराभव केला होता. त्या सामन्यात भारतीय संघाचा विजयाचा शिल्पकार राहुल द्रविड ठरला होता. त्याने पहिल्या डावात 233 तर दुसऱया डावात नाबाद 72 धावा जमविल्या होत्या. 2003 च्या कसोटी मालिकेत द्रविडने 619 धावा जमविल्या होत्या. द्रविडने ऑस्ट्रेलियात एकूर्ण 16 कसोटी सामने खेळले असून त्याने 41.64 धावांच्या सरासरीने 1166 धावा जमविल्या आहेत. भारतीय संघाला सध्या द्रविड सारख्या अनुभवी फलंदाजाकडून मार्गदर्शनाची जरूरी असल्याचे वेंगसरकर यांनी म्हटले आहे.