एलीस पेरीची अष्टपैलू चमक, स्मृती-हरमनप्रीतचे प्रयत्न अपुरे
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
येथे सुरू असलेल्या महिलांच्या तिरंगी टी-20 मालिकेत भारतीय महिलांना फलंदाजीतील खराब प्रदर्शनामुळे पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियन महिलांनी त्यांना 4 गडय़ांनी पराभूत केले.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारतीय महिलांनी 20 षटकांत 9 बाद 103 धावा जमविल्या. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी प्रतिकार करीत सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबवला. पण भारताला पुरेशी धावसंख्या जमविता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीने भेदक मारा करीत एका षटकात तीन बळी मिळविले आणि नंतर फलंदाजीत 47 चेंडूत 49 धावा करीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळविला होता तर शनिवारी सुपरओव्हरने ऑस्ट्रेलियाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे प्रत्येक संघाच्या नावावर एक विजय नोंद झाला आहे. भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध मेलबर्नमधील जंक्शन ओव्हलवर 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
भारतातर्फे सलामीवीर स्मृती मानधना (35) व कर्णधार हरमनप्रीत कौर (28) यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला प्रतिकार करता आला नाही. खेळपट्टीवर चेंडू बऱयापैकी बाऊन्स होत असल्याने त्याचाही फटका बसला. शेवटच्या सहा फलंदाजांनी केवळ 21 धावांची भर घातली. पेरीत्ने 13 धावांत 4 बळी मिळविले. त्यापैकी 14 व्या षटकात तिने हरमनप्रीत, तानिया भाटिया, दीप्ती शर्मा यांना बाद केले. 16 वर्षीय शेफाली वर्मा फक्त तीन चेंडू टिकली तर जेमिमा रॉड्रिग्जने 1 धावेसाठी 11 चेंडू घेतले. तीन षटकांतच भारताची स्थिती 2 बाद 16 अशी झाली होती. मानधना-हरमनप्रीत यांनी 40 धावांची भागीदारी करून थोडाफार डाव सावरला होता. पण हरमनप्रीत बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोलमडला. भारताच्या स्पिनर्सनी अचूक मारा केला. पण ऑस्ट्रेलियाला त्या विजयापासून रोखू शकल्या नाहीत.
तिन्ही संघासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असून 21 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियातच सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : भारतीय महिला 20 षटकांत 9 बाद 103 (स्मृती मानधना 23 चेंडूत 35, हरमनप्रीत 32 चेंडूत 28, राधा यादव 11 चेंडूत नाबाद 11, पेरी 4-13, टायला व्लेमिन्क 3-13), ऑस्ट्रेलियन महिला 18.5 षटकांत 6 बाद 104 (पेरी 47 चेंडूत 49, गार्डनर 14 चेंडूत 22, राजेश्वरी गायकवाड 2-18, दीप्ती शर्मा 1-18).