रानी रामपालच्या गोलमुळे पराभव टाळण्यात यश
वृत्तसंस्था/ ब्युनॉस एअर्स
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपालने चौथ्या सत्रामध्ये नोंदवलेल्या गोलमुळे येथे झालेल्या अर्जेन्टिना कनिष्ठ महिला संघाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सोडविण्यात भारताला यश आले. भारताने या सामन्यात पेनल्टी कॉर्नर गोल नोंदवण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या.
या दौऱयातील भारतीय महिलांचा हा सलग दुसरा अनिर्णीत सामना आहे. याआधी पहिला सामना 2-2 असा बरोबरीत सोडविला होता. भारताने प्रारंभापासूनच आक्रमणास सुरुवात केली आणि पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण गुरजित कौरचा जबरदस्त फटका अर्जेन्टिनाच्या गोलरक्षकाने अचूक थोपविला. पुन्हा पाचव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवरही दीप गेस एक्काने वाईड फटका मारल्याने ही संधीही वाया गेली. सहाव्या मिनिटानंतर यजमान अर्जेन्टिनाने सलग तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. त्यापैकी 13 व्या मिनिटाला मिळालेल्या शेवटच्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात त्यांना यश आले.
दुसऱया व तिसऱया सत्रात भारताने प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात घुसखोरी करीत अनेक संधी निर्माण केल्या. पण अर्जेन्टिनाचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. भारताने 37, 43, 48, 58 व्या मिनिटाला असे एकूण चार पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. यापैकी शेवटच्या पेनल्टी कॉर्नरवर रानी रामपालने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. नवनीत कौरने दिलेल्या पासवर रानीने जबरदस्त फटका मारत हा गोल नेंदवला. आता पुढील सामना 23 जानेवारी रोजी अर्जेन्टिना ब संघाविरुद्ध होणार आहे.