वृत्तसंस्था /मॅके
सध्या मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली आहे. आता आज (शुक्रवार) येथे उभय संघात दुसरा वनडे सामना खेळविला जाणार आहे.
तीन सामन्यांची ही वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करून आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा वनडे प्रकारातील हा सलग 25 वा विश्वविक्रमी विजय आहे.
शुक्रवारच्या दुसऱया सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांना फलंदाजीत सूर मिळणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियन संघातील एलिसा पेरी आणि ब्राऊन यांची फलंदाजी पहिल्या सामन्यात चांगलीच बहरली होती. या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करत सर्वच विभागात आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकली नाही. दुसऱया सामन्यातही ती खेळण्याची शक्यता कमी असल्याने दीप्ती शर्मावर अधिक दडपण राहील. भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यात 250 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दुसरीकडे, भारताची गोलंदाजी देखील निष्प्रभ ठरली होती.