वृत्तसंस्था/ क्विन्सटाऊन
यजमान न्यूझीलंड आणि भारत महिला क्रिकेट संघातील दुसरा वनडे सामना येथे मंगळवारी खेळविला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.30 वाजता प्रारंभ होईल. या मालिकेतील सलामीचा सामना गमविल्याने भारताला दुसऱया सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. दरम्यान फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन विभागात भारतीय संघाला सुधारणा करावी लागेल.
या मालिकेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताची गोलंदाजी भेदक आणि अचूक न झाल्याने यजमान न्यूझीलंडने 275 धावापर्यंत मजल मारली होती. फलंदाजीत कर्णधार मिताली राज वगळता इतर फलंदाजांची कामगिरी असमाधानकारक झाली. भारतीय संघाकडून अनेक जीवदाने मिळाल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 275 धावांचा टप्पा गाठला होता. मिताली राजने 59, यास्तिका भाटियाने 41 धावा जमविल्या. उपकर्णधार हरमनप्रित कौर फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला सलामीच्या स्मृती मानधनाची उणीव चांगलीच भासली. मंगळवारच्या दुसऱया सामन्यात रेणुका सिंग, मेघना सिंग, मानधना उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे कारण या खेळाडूंच्या क्वारंटाईनचा कालावधी वाढला आहे. पहिल्या सामन्यात भारताची स्थिती एकवेळ 2 बाद 105 अशीं भक्कम होती पण त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने भारताची स्थिती 6 बाद 165 अशी केविलवाणी झाली होती.
न्यूझीलंडच्या डावात सलामीच्या बेट्सने शानदार शतक झळकविले होते. वनडे क्रिकेटमधील तिचे हे अकरावे शतक होते. भारतातर्फे दिप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. आयसीसीची महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता तीन आठवडय़ावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे भारतीय संघाला न्यूझीलंडमधील वातावरण आणि खेळपटृय़ा यांच्याशी लवकर जुळवून घ्यावे लागेल. ही स्पर्धा न्यूझीलंडमध्ये खेळविली जाणार आहे. न्यूझीलंडच्या खेळपटृय़ा वेगवान गोलंदाजीला अनुकूल असून हवामानामध्ये वारंवार वादळी वातावरण निर्माण होत आहे. या मालिकेत भारतीय संघाला न्यूझीलंडशी बरोबरी साधण्यासाठी मंगळवारच्या सामन्यात क्रिकेटच्या सर्वच विभागात चांगली कामगिरी करावी लागेल.