वृत्तसंस्था/ पॅरीस
दीपिका कुमारीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला तिरंदाजी संघ सोमवारी पॅरीसमध्ये दाखल झाला आहे. 20 जूनपासून फ्रान्समध्ये होणाऱया टोकियो ऑलिंपिक पात्रता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या पात्रता स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाज सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
फ्रान्समध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय महिला तिरंदाजांना 10 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. भारताच्या अव्वल महिला तिरंदाजपटू दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कोमलिका बारी यांना टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट मिळविण्यासाठी ही शेवटची पात्रता स्पर्धा असून त्यांना पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवावे लागणार आहे. 2019 साली झालेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत चांगली कामगिरी करून भारताच्या पुरूष तिरंदाजी संघाने ऑलिंपिकचे तिकीट मिळविले आहे. आगामी विश्वचषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धा ग्वाटेमाला शहरामध्ये होणार असून या स्पर्धेत भारताचे पुरूष आणि महिला तिरंदाजी संघ भाग घेणार आहेत. भारतीय पुरूष रिकर्व्ह आणि कंपाऊंड संघ मंगळवारी पॅरीसला रवाना होणार आहेत.