आघाडीवीरांच्या बहारदार फलंदाजीमुळे भारताचा बांगलादेशविरुद्ध 59 धावांनी सहज विजय,
सिल्हेत-बांगलादेश / वृत्तसंस्था
शफाली वर्माने 44 चेंडूत 55 धावांची अर्धशतकी खेळी साकारत गोलंदाजीतही वरचष्मा गाजवल्यानंतर भारतीय महिला संघाने आशिया चषक टी-20 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगलादेशचा 59 धावांनी धुव्वा उडवला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. या लढतीत भारतीय महिला संघाने 20 षटकात 5 बाद 159 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात बांगलादेश महिला संघाला 20 षटकात 7 बाद 100 धावांवर समाधान मानावे लागले.
यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध मागील लढतीत हाराकिरीचा मोठा धक्का बसल्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध आपली मोहीम पुन्हा एकदा विजयाच्या ट्रकवर आणली. शफाली वर्मा व हंगामी कर्णधार स्मृती मानधना (38 चेंडूत 47) यांनी 96 धावांची सलामी दिली, ते भारतासाठी विशेष महत्त्वाचे ठरले.
जेमिमा रॉड्रिग्यूजने 24 चेंडूत नाबाद 35 धावांची जलद खेळी साकारल्याने भारताला 160 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले. बांगलादेशला प्रत्युत्तरात 20 षटकात 7 बाद 100 धावांपर्यंत मजल मारता आली. विजयासाठी 160 धावांचे आव्हान असताना ते एकदाही विजयाच्या ट्रकवर दिसून आले नाहीत.
भारतीय महिला संघाने आता 5 सामन्यात 8 गुण मिळवले असून 7 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत संघ अव्वलस्थानी विराजमान आहे. राऊंड रॉबिन फेरीत भारताचा आणखी एक सामना बाकी आहे. आपल्या आजवरच्या टी-20 इतिहासात आतापर्यंत एकदाही 142 धावांचा यशस्वी पाठलाग करु न शकलेल्या बांगलादेशने हरसंभव प्रयत्न केले. पण, यानंतरही ते विजयापासून कित्येक कोस दूर राहिले.
यजमान बांगलादेशला पहिल्या 10 षटकात 50 धावाही करता आल्या नाहीत आणि त्यामुळे उर्वरित 10 षटकात आणखी 110 पेक्षा अधिक धावा फटकावणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय होते. शफाली (2-10), दीप्ती (2-13), स्नेह राणा (1-17) यांनी नियंत्रित मारा करत बांगलादेशवर सातत्याने वर्चस्व गाजवले. संथ खेळपट्टीमुळे चेंडू बॅटवर येत नव्हता. यामुळे, यजमान संघाच्या प्रयत्नांवर बऱयाच मर्यादा राहिल्या.
फरगाना हक (40 चेंडूत 30), मुरशिदा खातून (25 चेंडूत 21) यांना पहिल्या 9 षटकात केवळ 45 धावांची भागीदारी करता आली आणि याचवेळी बांगलादेशचा पराभव एव्हाना निश्चित झाला होता.
शफालीची फटकेबाजी
प्रारंभी, शफालीने 5 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी करत आपला फॉर्म अधोरेखित केला. तिने टी-20 क्रिकेट प्रकारात येथे आपले चौथे अर्धशतक साजरे केले. शिवाय, यात 1 हजार धावांचा टप्पा देखील सर केला. मानधना, शफाली बाद झाल्यानंतर बहरातील जेमिमाने सर्व सूत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी केली. तिने दीप्ती शर्मासह अवघ्या 2.3 षटकात 29 धावांची लयलूट केली.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ ः 20 षटकात 5 बाद 159 (शफाली वर्मा 44 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 55, स्मृती मानधना 38 चेंडूत 6 चौकारांसह 47, जेमिमा रॉड्रिग्यूज 24 चेंडूत नाबाद 35, दीप्ती शर्मा 10. अवांतर 7. रुमाना अहमद 3 षटकात 3-27, सलमा खातून 3 षटकात 1-16).
बांगलादेश महिला संघ ः 20 षटकात 7 बाद 100 (निगार सुलताना 29 चेंडूत 5 चौकारांसह 36, फरगाना हक 40 चेंडूत 3 चौकारांसह 30, मुरशिदा खातून 25 चेंडूत 2 चौकारांसह 21. अवांतर 2. दीप्ती शर्मा 2-13, शफाली वर्मा 2-10, रेणुका सिंग, स्नेह राणा प्रत्येकी 1 बळी).