वृत्तसंस्था/ पल्लेकेले (लंका)
यजमान लंका आणि भारत महिला क्रिकेट संघामध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सोमवारी येथे दुसरा सामना खेळविला जाणार आहे. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. या मालिकेत भारताने लंकेवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
या मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला मोठी धावसंख्या रचता आली नाही. पण, प्रभावी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला होता. कर्णधार हरमनप्रित कौरची पहिल्या सामन्यातील फलंदाजी समाधानकारक झाली आहे. लंकेतील खेळपट्टय़ा फिरकीला अनुकूल असल्याने भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.
पहिल्या सामन्यात मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने 29 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर दीप्ती शर्माच्या फिरकी गोलंदाजीने लंकेला 171 धावांवर रोखले होते. पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाजीमध्ये सातत्य दिसले नाही. शफाली वर्मा, देओल दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार यांच्याकडून चांगली कामगिरी होणे जरूरीचे आहे.
लंकन संघाची कर्णधार चमारी अट्टापटूला पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करता आलेली नाही. फलंदाजी तसेच गोलंदाजीतही लंकन संघ खूपच कमी पडला. लंकन संघाला या मालिकेत आपले आव्हान जिवंत राखण्यासाठी आजच्या दुसऱया सामन्यात सांघिक कामगिरी जरूरीची आहे. लंकन महिला संघाला गेल्या महिन्यात पाकविरूद्ध झालेली मालिका गमवावी लागली होती. लंकन संघ आता सलग दुसरी मालिका वाचविण्यासाठी प्रयत्न करेल. सोमवारच्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल.