झुंजार लढत देऊनही पदकापासून वंचित, ग्रेट ब्रिटनने मिळविले कांस्य, नेदरलँड्सला सुवर्ण
वृत्तसंस्था/ टोकियो
भारताच्या महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. पण पदक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अखेर भंगले आहे. येथे झालेल्या कांस्यपदकाच्या प्लेऑफ लढतीत भारतीय महिलांना झुंजार खेळ करूनही ग्रेट ब्रिटनकडून 3-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ब्रिटन कांस्यपदकाचे मानकरी ठरले. नेदरलँड्सने अर्जेन्टिनाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून चौथ्यांदा सुवर्णपदक पटकावले. रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रौप्यपदक मिळविले होते.
भारतीय महिलांनी या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करीत अपेक्षेहून अधिक चांगले प्रदर्शन केले आणि पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला. पहिले पदक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न मात्र साकार होऊ शकले नाही. चौथ्या मानांकित ग्रेट ब्रिटनने चुरशीच्या लढतीत भारतावर मात करून तिसरे स्थान मिळविले. ग्रेट ब्रिटनने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. भारताने चौथे स्थान मिळवित ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली. यापूर्वी 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्येही भारताला चौथे स्थान मिळाले होते. मात्र त्यावेळी केवळ सहा संघांचा सहभाग होता आणि राऊंड रॉबिन पद्धतीने त्यावेळी सामने खेळविले गेल्यानंतर अव्वल दोन संघांत अंतिम लढत झाली होती. आदल्या दिवशी गुरुवारी भारताच्या पुरुष संघाने कांस्य मिळवित 41 वर्षाच्या खंडानंतर ऑलिम्पिक पदक पटकावताना जर्मनीचा पराभव केला होता. महिला संघही त्याची पुनरावृत्ती करेल, अशीच सर्वांची अपेक्षा होती. पण अखेर निराशा पदरी पडली.
भारतीय महिलांनी या सामन्यात जीव तोडून खेळ केला आणि दोन गोलांची पिछाडी भरून काढत मध्यंतरापर्यंत 3-2 अशी आघाडीही मिळविली होती. पण उत्तरार्धात गेट ब्रिटनच्या महिलांनी जबरदस्त खेळ करीत दोन गोल नोंदवून भारताच्या हातातील सामना हिसकावला. भारताने पाच मिनिटांच्या अवधीत तीन गोल नोंदवले. गुरजित कौरने (25 व 26 व्या मिनिट) दोन तर वंदना कटारियाने एक गोल करीत ब्रिटनला चकित केले होते. ब्रिटनच्या इलेना रेयर (16 वे मिनिट), सारा रॉबर्टसन (24) व कर्णधार हॉली पीयर्ने वेब (35), ग्रेस बाल्डसन (48) यांनी चार गोल नोंदवत कांस्यपदक निश्चित केले.
अपेक्षेप्रमाणे ब्रिटनने प्रारंभापासूनच आक्रमण सुरू करीत चेंडूवर जास्तीत जास्त वेळ ताबा ठेवला. भारतानेही त्यांच्या हद्दीत घुसखोरी केली. पण त्यांना गोलची संधी निर्माण करता आली नाही. गोलरक्षक सविताने मात्र पहिल्या सत्रात किमान तीन गोल वाचवताना अप्रतिम गोलरक्षण केले. दुसऱया सत्रातही ब्रिटनचा वेगवान खेळ सुरूच राहिला आणि त्यांनी 16 व्या मिनिटाला आघाडीही मिळविली. इलेना रेयरने केलेला पुश दीप ग्रेस एक्काच्या स्टिकला लागून भारतीय गोलपोस्टमध्ये गेल्याने हा गोल झाला. पुढच्याच मिनिटाला त्यांनी तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण तो वाया गेला. लालरेमसियामीला गोलची चांगली संधी मिळाली होती. पण अनुभवी मॅडी हिन्चने अप्रतिम गोलरक्षण करीत तिचा प्रयत्न फोल ठरविला. भारतीय गोलरक्षक सविताने नंतरही अनेकदा उत्कृष्ट गोलरक्षण करीत ब्रिटनचे प्रयत्न वाया घालविले. तिसऱया सत्राच्या शेवटच्या मिनिटास भारताने सातवा पेनल्टी कॉर्नर मिळविला, पण त्याचा फायदा झाला नाही. चौथ्या सत्रात मात्र ब्रिटननेच पूर्ण वर्चस्व राखत भारतावर प्रचंड दडपण आणले आणि भारतीय बचावफळी त्याला बळी पडल्याने त्यांना यशही मिळाले. त्यांना सलग तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि त्यातील तिसऱयावर बाल्डसनने गोल नोंदवून भारतावर आघाडी घेतली. आठ मिनिटे असताना भारताला पीसी मिळाला. पण ब्रिटनने त्यावर उत्तम बचाव केला. त्यांनी नंतर भारताला संधी मिळणार नाही, याची दक्षता घेत कांस्यपदक निश्चित केल्यावर जल्लोष सुरू केला.
चौथे स्थान मानाचेच असले तरी पदक हुकल्याचे दुःख- राणी रामपाल
महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीचा कर्णधार राणी रामपालला अभिमानच वाटतो, पण इतके जवळ येऊनही पदक हुकल्याचे दुःखही तिच्या जिव्हारी लागले आहे. अपेक्षेहून सरस कामगिरी करीत या संघाने ऑलिम्पिकमध्ये प्रथमच उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला. पण पदक मिळविण्यात त्यांना अपयश आल्यानंतर सर्वच खेळाडू निराश झाल्या आणि काहींना तर अश्रूही आवरता आले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला तेव्हा त्या रडत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी खेळाडूंना धीर दिला आणि त्यांनी केलेल्या जिगरबाज खेळाचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहित केले.
‘इतक्या जवळ येऊनही पदक मिळवता आले नाही, याचे खूपच वाईट वाटते. ऑलिम्पिकमध्ये चौथा क्रमांक मिळविणे ही मोठी कामगिरी आहे, यात शंका नाही. मात्र पदकाने हुलकावणी दिल्याचे खूप वाईट वाटते. संघातील प्रत्येकाने खूप मनापासून सर्वोत्तम प्रयत्न केले, त्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. या यशासाठी आम्ही दीर्घ काळापासून मेहनत घेतली आणि एकसंध होऊन आम्ही या स्पर्धेत खेळलो. आमची कामगिरी नवोदितांसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरेल,’ अशा भावना राणीने व्यक्त केल्या.
कोट्स
‘मैदानावर शानदार आणि जिगरबाज खेळ करीत साऱया भारतीयांची मने तुम्ही जिंकली आहेत. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.’
-राष्ट्रपती राम नाथ कोविंद
या महिला संघाच्या कर्तबगारीच्या कथा भावी पिढय़ांना निश्चितच प्रेरणादायक ठरतील. दोन वर्षापूर्वी ऑलिम्पिक पात्रता फेरीतील सामना असाच जबरदस्त दडपणाखाली खेळला गेला होता. अशा प्रकारचे सामने त्यांना जास्त प्रमाणात खेळायला मिळण्याची गरज आहे. त्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल. हॉकी इंडियाने लीग आणि अन्य स्पर्धा आयोजित करणे हा यावरील एक उपाय आहे. भविष्यात ते घडेल, अशी मी आशा करतो. कारण तेच पुढचे पाऊल ठरणार आहे.
-महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक सोएर्द मारिने