अर्जेन्टिना दौऱयात आठ सामन्यांची मालिका खेळणार, पुरुषांच्या मालिकेसाठी हॉकी इंडिया प्रयत्नशील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्जेन्टिनाविरुद्ध होणाऱया मालिकेत चांगले प्रदर्शन करता आल्यास ऑलिम्पिक स्पर्धेत उतरण्याआधी आपल्या संघाच्या आत्मविश्वासात निश्चितच वाढ होईल, असे मत भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपालने व्यक्त केले. भारतीय महिला हॉकी संघ रविवारी अर्जेन्टिना दौऱयावर जाणार असून तेथे हा संघ एकूण आठ सामने खेळणार आहे.
17 ते 31 जानेवारी या कालावधीत हे सामने होणार आहेत. यासाठी 3 जानेवारी रोजी 25 खेळाडू व साहायक स्टाफमधील सात जण अर्जेन्टिनाकडे प्रयाण करणार आहेत. कोरोना महामारीच्या दीर्घ ब्रेकनंतर भारतीय हॉकीचे पुनरागमन होत असून ऑलिम्पिकच्या तयारीचा भाग म्हणून ही मालिका आयोजित करण्यात आली आहे. ‘अर्जेन्टिनाविरुद्ध आमच्या क्षमतेनुसार आम्ही खेळ केला तर आमच्या आत्मविश्वासात निश्चितच वाढ होईल आणि ऑलिम्पिकसाठी तो मोलाचा ठरू शकेल. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे हाच आमचा निर्धार आहे,’ असे रानीने म्हटल्याचे हॉकी इंडियाने निवेदनात सांगितले. ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवून देशावासीयांचा गौरव वाढविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यात आम्ही यशस्वी होऊ शकेन, असा मला विश्वास वाटतो. या वर्षात खेळल्या जाणाऱया प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम योगदान देण्याचाच आमचा प्रयत्न असेल,’ असेही तिने म्हटले आहे. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करावयास मिळणार असल्याने आम्ही रोमांचित झालो आहोत. मागील वर्ष आम्हा सर्वांसाठीच खूप कठीण गेले आहे. मात्र राष्ट्रीय शिबिरात कौशल्य वाढविण्यासाठी आम्ही कठोर सराव केला आहे,’ असे रानी पुढे म्हणाली. दीर्घ काळाच्या ब्रेकनंतर आपल्या सहकाऱयांना चांगले प्रदर्शन करण्याचा विश्वास वाटत आहे. पण प्रत्यक्ष सामन्यात त्या कसा प्रतिसाद ते पाहणे मनोरंजक ठरेल, असे रानी म्हणते.
पुरुषांच्या सामन्यांसाठी प्रयत्नशील
महिला संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सज्ज होत असताना हॉकी इंडियाने पुरुष संघाचे सामने आयोजित करण्यासाठी अनेक देशांशी बोलणी सुरू केली आहेत. गेल्या वर्षी 22 फेब्रुवारी रोजी हॉकी प्रो लीगमध्ये भारताच्या पुरुष संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टोकियो ऑलिम्पिकआधी मॅचप्रक्टिस मिळणे अत्यंत जरूरीचे असल्याचे मत कर्णधार मनप्रीत सिंगने व्यक्त केले. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा खेळण्यास आम्हीही आतुर झालो आहोत. ऑलिम्पिकआधी आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याचा सराव मिळणे गरजेचे आहे. एखाद्या बलाढय़ संघाविरुद्ध सामने आयोजित केल्यास ऑलिम्पिकची चांगली तयारी करता येऊ शकते. हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून गेल्या काही महिन्यांत आम्ही कठोर सराव केला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय सामन्यात जसा खेळ करतो, तो स्तर गाठण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जुलैमध्ये होणाऱया ऑलिम्पिकमध्ये क्षमतेनुसार खेळ केला तर पदक मिळविण्यात आम्ही निश्चितच यशस्वी होऊ,’ असा विश्वास मनप्रीतने व्यक्त केला.
दोन्ही कनिष्ठ संघही पुनरागमनास उत्सुक
भारताच्या कनिष्ठ महिला व पुरुष संघांनीही 2019 व 2020 पासून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. ‘यावर्षी पुरुषांची कनिष्ठ विश्वचषक हॉकी आणि एएचएफ कनिष्ठ आशिया चषक स्पर्धा होणार असून त्यांची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करीत आहोत,’ असे कनिष्ठ हॉकी संघातील बचावपटू संजय म्हणाला. या स्पर्धा अनुक्रमे भारत व बांगलादेशमध्ये होणार आहेत. कनिष्ठ महिला संघातील बचावपटू इशिका चौधरीने मात्र एएचएफ महिला कनिष्ठ आशिया चषक स्पर्धा, हे आपले पहिले लक्ष्य असल्याचे सांगितले. ‘राष्ट्रीय शिबिरात दाखल झाल्यापासून आम्ही या स्पर्धेचीच तयारी करीत आहोत. एखाद्या स्पर्धेचे लक्ष्य ठेवून तयारी करताना खेळ उंचावत नेणे खूप उपयुक्त ठरणारे असते,’ असे ती म्हणाली.