वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जकार्ता येथे 2018 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र रिले प्रकारात भारतीय संघाने यापूर्वी रौप्यपदक पटकाविले होते. पण आता भारताच्या मिश्र रिले संघाला सुवर्णपदक आणि महिला धावपटू अनु राघवनला वैयक्तिक कांस्य मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या स्पर्धेत 4ƒ400 मीटर मिश्र रिले क्रीडा प्रकारात बहरीनच्या संघाने सुवर्णपदक मिळविले होते तर भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. सुवर्णपदक विजेत्या बहरीन संघातील किमी ऍडेकोया उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे बहरीन रिले संघाचे सुवर्णपदक रद्द केल्याची घोषणा आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजकांनी केली. त्यामुळे भारतीय मिश्र रिले संघाला रौप्यपदकाऐवजी सुवर्णपदक मिळाल्याची घोषणा करण्यात आली. भारतीय रिले संघामध्ये मोहम्मद अनास, एम. आर. पुवम्मा, हिमा दास आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. दोषी ठरलेल्या बहरीनच्या ऍडेकोयाचे 24 ऑगस्ट 2018 आणि 26 नोव्हेंबर 2018 या कालावधीतील सर्व निकाल रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या 400 मी. हर्डल्समध्ये चौथे स्थान मिळविलेल्या भारताच्या अनु राघवनला बढती मिळाल्याने तिला कांस्यपदक मिळणार आहे. अनुने 56.77 सेकंद वेळ नोंदवली होती.
या स्पर्धेतील मिश्र रिलेच्या अंतिम फेरीत भारतीय रिले संघाने बहरीन रिले संघाविरुद्ध अडथळा आणल्याबद्दल लेखी तक्रार स्पर्धा आयोजकांकडे केली होती. पण त्यानंतर या स्पर्धेच्या तांत्रिक समितीने भारताची ही तक्रार फेटाळली होती. भारतीय मिश्र रिले संघाने 3 मिनिटे, 15.71 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान मिळविले होते. पण आता बहरीन संघाचे सुवर्णपदक रद्द करण्यात आल्याने भारतीय रिले संघाला या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे. 2018 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत हा क्रीडा प्रकार पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आला होता. त्यामुळे भारत हा आता या प्रकारातील पहिला सुवर्णविजेता ठरला आहे.